संजय राऊतचं थोबाड जेवढं उघडत राहणार तेवढं उद्धव ठाकरे खड्ड्यात जाणार…
आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल
मुंबई : माजी पोलीस कमिशनर मीरा बोरवणकर (Mira Borvankar) यांनी सकाळी झालेल्या एका पत्रकार परिषदेत नीलम गो-हे, मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात पुण्यात दंगल भडकवण्याविषयी, व्हॉयलेन्स कसा करावा याविषयी पोलीस खात्यात पुरावे होते, असे म्हटले. याच मुद्द्यावरुन भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उबाठाचे (Ubatha) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. तसेच समाजवाद्यांसोबत युती करुन बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचारांशी गद्दारी करणारा उबाठा गट या निवडणुकीनंतर अस्तित्वातही राहणार नाही, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला.
नितेश राणे म्हणाले, मी जे वारंवार बोलतो की उद्धव ठाकरे हा महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्यात अग्रेसर आहे. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा दंगल घडली आहे तेव्हा तेव्हा मी उद्धव ठाकरेंच्या नार्कोटेस्टची मागणी केली आहे. तेव्हा नीलम गो-हे, मिलिंद नार्वेकर म्हणजे कोण तर उद्धव ठाकरे. मिलिंद नार्वेकर हे उद्धवजींचे आजही खासगी सचिव आहेत. आणि या दोघांनाही उद्धव ठाकरेंचेच आदेश होते की तुम्ही महाराष्ट्रात दंगल घडवा. माजी पोलीस कमिशनर स्वतः हे सांगत आहेत, त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे.
पुढे ते म्हणाले, राम मंदिर उद्धाटनाप्रसंगी देशामध्ये दंगली होतील असं आतापासून कोण भाषण करतंय? तर उद्धव ठाकरे. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था भडकवण्याचं काम त्याने केलं आहे. राज्यात गेल्या दीड-दोन वर्षांपासून ज्या दंगली झाल्या किंवा उद्या राम मंदिराच्या दिशेने जाणार्या रामभक्तांना कुठल्याही प्रकारे गालबोट लागलं तर त्याला जबाबदार हा उद्धव ठाकरे असणार कारण आतापासून तो दंगलीची भाषा करतोय.
संजय राऊतचं थोबाड जेवढं उघडत राहणार तेवढं उद्धव ठाकरे खड्ड्यात जाणार…
आज सकाळी संजय राजाराम राऊतने (Sanjay Raut) विधानसभा अध्यक्षांसमोर जी आमदार अपात्रतेची सुनावणी होणार आहे, त्याविषयी टिकाटिप्पणी केली आहे. संजय राऊत हा उबाठाची किती वाट लावणार याला काही मर्यादा राहिलेली नाही. याचं थोबाड जेवढं उघडत राहणार तेवढं उद्धव ठाकरे खड्ड्यात जात राहणार, हे आता अधोरेखित झालं आहे. दीपक केसरकरांनी सांगितलं होतं की मोदीजींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत युतीसाठी तयार झाले होते. मात्र, या संजय राऊतने शरद पवारांना (Sharad Pawar) जाऊन सांगितल्यानंतर तो सगळा विषय फिस्कटला. ज्या प्रकारे संजय राऊत विधानसभा अध्यक्षांवर टीका करतोय त्याचा अर्थ तो त्यांना निकाल आमच्याच बाजूने लावा असा दबाव टाकत आहे, याची माननीय कोर्टाने दखल घ्यावी, असं नितेश राणे म्हणाले.
नाही तुझे कपडे काढून अख्ख्या महाराष्ट्रात तुझी धिंड काढली तर…
राहुल नार्वेकरांच्या वेळापत्रकावर संजय राऊत टिप्पणी करतो पण तुझं वेळापत्रक आधीच ठरलेलं आहे. दिवाळीपर्यंत तुझ्या कुटुंबातला एक माणूस खिचडीचोरीच्या आरोपाखाली आर्थर रोड जेलमध्ये बसणार आहे. पत्राचाळ आणि कोविडच्या भ्रष्टाचारामुळे तू पण लवकरच जेलमध्ये जाणार आहेस आणि तुझी खासदारकी जाणार आहे. जर एवढीच तुझ्यात हिंमत असेल तर ज्या सरकारला तू घटनाबाह्य म्हणतोस त्या सरकारने दिलेलं संरक्षण २४ तासांसाठी काढ, महाराष्ट्राची जनता तर सोडच पण जे कडवे आणि सच्चे शिवसैनिक आहेत, त्यांनीदेखील नाही तुझे कपडे काढून अख्ख्या महाराष्ट्रात तुझी धिंड काढली तर मी माझं नाव बदलेन, असं नितेश राणे म्हणाले.
समाजवाद्यांशी युती हा उद्धव ठाकरेंचा स्वतःला संपवण्याचा शेवटचा डाव
समाजवादी विचार किती प्रभावी आहेत हे रोज संजय राऊत टेपरेकॉर्डर लावल्यासारखा सांगत राहतो. ज्याला मुळात बाळासाहेबच कधी कळले नाहीत, ज्याने कधी मुळापासून बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांची जडणघडणच पाहिली नाही, ज्या जॉर्ज फर्नांडिस आणि मृणाल गोरेंनी बाळासाहेबांसोबत युती करणं टाळलं त्याच्याबद्दलच संजय राऊत आज गोडवे गाताना दिसतोय. जेवढं काँग्रेसचे लोक सोनिया आणि राहुल गांधींचे गोडवे गात नाहीत तेवढा हा समाजवाद्यांच्या प्रेमात पडलेला आहे. समाजवाद्यांशी युती करुन उद्धव ठाकरेंनी स्वतःला संपवण्याचा शेवटचा डाव टाकला आहे. येणार्या निवडणुकीनंतर उबाठा नावाची संघटना अस्तित्वात राहणार नाही, याची काळजी या दोघांनी घेतलेली आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.