भाजप आमदार नितेश राणे यांचे भाकीत खरे ठरले!
मुंबई: महामहाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेचे भवितव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर धोक्यात आले आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुढे वज्रमुठ सभा होणार नाही असे संकेत दिले आहेत. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी याबाबतचे भविष्य आधीच वर्तवले होते. १ मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची होणारी सभा ही शेवटची वज्रमुठ सभा असेल असे भाकीत नितेश राणे यांनी केले होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यातील वज्रमुठ सभेबाबत बोलताना सांगितले की वज्रमुठ सभेचा निर्णय एकत्रित बैठक घेऊन घेतला जाईल असं म्हटलं आहे. राज्यात सध्या विविध ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची याबाबत लवकरच बैठक होईल. पुण्यातील वज्रमुठ सभा होईल की नाही याबाबत आताच सांगता येणार नाही, असे विधान नाना पटोले यांनी केलं. नानांच्या या विधानाचे अनेक अर्थ लावले जात आहेत. एकीकडे पवारांचा राजीनामा आणि दुसरीकडे पुण्यातील सभेबाबत नानाचं हे विधान आता सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलं आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबईनंतर आता पुण्यात याच महिन्यात ही वज्रमुठ सभा होत आहे. या सभेची जबाबदारी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. या सभेसाठी शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने पुणे शहरातील नेत्यांची बैठक पार पडली. तर, पुढेही बैठका होणार आहेत. मात्र, तत्पूर्वीच नाना पटोले यांनी पावसाचं कारण देत सभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
दरम्यान, भाजप खासदार सुजय विखे पाटील महाविकास आघाडीची वज्रमुठ म्हणजे समुद्रातील वाळू घट्ट धरल्यानंतर जशी हातातून निसटते तसा प्रकार आहे, असं म्हटलं आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आधीच निम्मा कार्यक्रम केला आहे, असेही म्हणत यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभांवर टीका केलीय.