जय शहा यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लंडनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात भारतीय संघ नव्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे. तसेच भारतीय क्रिकेट संघाचा नवीन किट प्रायोजक आदिदास असेल. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मला कळवताना अतिशय आनंद होत आहे की बीसीसीआयने किट प्रायोजक म्हणून आदिदास कंपनीशी करार केला आहे. क्रिकेटचा खेळ पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जगातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्सवेअर कंपनीसोबत करार केल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे.
आयपीएलनंतर भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना ७ ते ११ जून दरम्यान लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापासून भारतीय संघ नव्या जर्सीमध्ये मैदानात खेळताना दिसणार आहे.