- ऐकलंत का! : दीपक परब
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले होते की, ‘मुनगंटीवार हे महाराजांची वाघनखे आणताहेत, त्याबद्दल अभिनंदन! जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर बघा’. त्यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. आरोप-प्रत्यारोप झाले. ‘त्या’ ट्वीटमागच्या भूमिकेबद्दल पाटेकर म्हणाले, ‘सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे. व्यवस्थेतील राजकीय मंडळी हा भ्रष्टाचार नाहीसा करण्यासाठी प्रयत्न करू शकतात. राजकारण्यांना चिमटे काढणं गरजेचं आहे. भ्रष्टाचारामध्ये आपले नाव येत असेल, तर त्याच्यासारखे दुर्दैव नाही. सगळेच वाईट आहेत अशातला भाग नाही. फक्त काही मंडळीच वाईट आहेत. आपण कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाही हे दुर्दैव आहे. पण न पटणाऱ्या गोष्टीवर बोलणं गरजेचं आहे. फक्त मेणबत्त्या पेटवून काही होत नाही. आपण शांत राहिलो, तर अनेक गोष्टी गृहीत धरल्या जातात. त्यामुळे मी शांत बसू शकत नाही. जरी मला उद्या कोणी गोळी घातली तरी मला त्याचं काही वाटणार नाही. पण मला ‘मी’ म्हणून इतकी वर्षे जगता आलं याचा मला आनंद आहे. समाज काय बोलेल यात मला आयुष्य घालवायचं नाही.
अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारी शिवाजी महाराजांची वाघनखे ब्रिटनने आपणास देण्यास मान्यता दिली असून, त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार इंग्लंडला जाणार आहेत, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करणार असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर नाना पाटेकर यांनी एक पोस्ट शेअर करत सुधीर मुनगंटीवारांना डिवलचं. त्यांनी म्हटलंय, ‘मुनगंटीवार महाराजांची वाघनखे आणत आहेत… त्याबद्दल अभिनंदन! जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पाहा.’