Tuesday, May 14, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनछत्रपती शिवाजी महाराजांनी गौरवलेली पराक्रमी राणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी गौरवलेली पराक्रमी राणी

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

उद्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची जयंती. महाराजांचा इतिहास हा रोमांचकारी आहे. या इतिहासाच्या पानावर एका पराक्रमी राणीचा देखील भाग आहे. जिच्या पराक्रमाने साक्षात महाराज स्तंभित झाले. ती राणी म्हणजे बेलवडी संस्थानाची राणी मल्लम्मा.

बेलवडी हे छोटेसे राज्य होते. त्याचा प्रदेश आजच्या बेळगावी आणि धारवाड जिल्ह्यांच्या काही भागांत पसरलेला होता. शिवबसव शास्त्री यांनी लिहिलेल्या थारातुरी पंचमारा इतिहास या सुरुवातीच्या कन्नड ग्रंथात या रियासतचा इतिहास १५११चा आहे. त्याचा पहिला शासक चंद्रशेखर राजा विजयनगर साम्राज्याचा राजा म्हणून कारभार पाहू लागला. विजयनगरच्या पतनानंतर बेलवडी स्वतंत्र संस्थान बनले. १७ व्या शतकामध्ये येसाजी प्रभुदेसाई बेलवडीचा राज्यकारभार करू लागले. येसाजी प्रभुदेसाई यांची राणी मल्लम्मा ही शूरवीर होती.

राणी मलम्मा ही आजच्या उत्तरा कन्नड जिल्ह्यावर आणि दक्षिण गोव्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या सोंडा राज्याचे शासक मधुलिंग नायक यांची मुलगी होती. त्या काळात गरज अशी होती की, जेव्हा पुरुष लढाईत उतरायचे तेव्हा महिलांना संरक्षणाची दुसरी फळी म्हणून सज्ज राहावे लागे. त्यामुळे राजघराण्यातील मुला-मुलींना ललित कलांचे तसेच युद्धकलेचे प्रशिक्षण दिले जात असे. याच कारणामुळे या काळात आपल्याला बहुतेक दिग्गज योद्धा महिलांचा इतिहास वाचायला मिळतो. सोंडा राजाने प्रख्यात गुरू शंकर भट्ट यांच्या हाताखाली तिच्या भावांसह मल्लम्माच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली. तरुण मल्लम्माने तिची क्षमता सिद्ध केली. घोडेस्वारी, भालाफेक, तलवारबाजी आणि तिरंदाजीमध्ये ती पारंगत झाली होती. बेलवडीच्या राजघराण्याची सून होईपर्यंत ती प्रशासन व लष्करी कौशल्य या दोन्ही बाबतींत तरबेज झाली.

मल्लम्मा विवाहयोग्य वयात आल्यावर, तिच्या वडिलांनी स्वयंवराची व्यवस्था केली. इच्छुक वराला एक महिन्याच्या आत त्याच्या वयाच्या बरोबरीच्या वाघांच्या संख्येइतकी शिकार करून आपले शौर्य सिद्ध करायचे होते. बेलवडीच्या २० वर्षीय राजपुत्र येसाजी प्रभुदेसाईने निर्धारित वेळेत २१ वाघांची शिकार करून हे आव्हान पेलले. राजकन्या मल्लम्माने राजपुत्र येसाजीच्या गळ्यात वरमाला घातली. त्याकाळी मल्लम्मास राज्यकारभारात लक्ष देण्यास त्याने प्रोत्साहित केले होते. प्रशासनात आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून मल्लम्मा कारभार करत होती. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मल्लम्माने महिलांना युद्धकलेचे प्रशिक्षण दिले आणि ५,००० महिलांची प्रबळ सेना उभी केली. ही त्या काळातील एक दुर्मीळ कामगिरी मानली जाते. अशा प्रकारे प्रभुदेसाई या दाम्पत्यांच्या राजवटीत बेलवडी राज्य समृद्ध होते.

याच काळात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती म्हणून सर्वत्र ओळखले जाऊ लागले. महाराजांनी दख्खनमधील आपले स्थान बळकट केल्यानंतर, १६७६ मध्ये खान्देश, फोंडा, कारवार, कोल्हापूर व अथणी हे प्रदेश पादाक्रांत करत दक्षिणेकडे कूच केली. १६७८ च्या जानेवारीच्या मध्यात, शिवाजीच्या महाराजांच्या सैन्याने विश्रांती घेण्याचे ठरवले आणि यादवड गावात तळ ठोकला. कर्नाटकात शिवाजी महाराजांची लोकप्रियता वेगाने वाढत होती. येसाजी प्रभुदेसाई देखील शिवाजी महाराजांचा प्रशंसक होता. त्याने महाराजांच्या भव्य स्वागताची योजनाही आखली होती. तथापि, काही मराठा सैनिकांच्या अनुचित प्रकारामुळे एक घटना घडली, ज्यामुळे शत्रुत्व निर्माण झाले.

झाले असे की, मुक्कामासाठी छावणी उभारलेल्या मराठा सैनिकांना दुधाची कमतरता भासली. त्यांनी जवळच्या गावातील शेतकऱ्यांकडे त्याची मागणी केली. मात्र दररोजच्या ग्राहकांना अडचण होऊ शकते. त्यामुळे दूध पुरवठा करण्यास ग्रामस्थांनी असहायता व्यक्त केली. हा नकार काही सैनिकांना आवडला नाही. प्रत्युत्तर म्हणून सैनिकांनी रात्री गावकऱ्यांची गुरे चोरून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी आपल्या राजाकडे, येसाजी प्रभुदेसाईंकडे तक्रार केली. येसाजीने सेनापती सिद्धनगौडा पाटीलला वाटाघाटी करून गुरेढोरे परत आणण्यासाठी पाठवले. मात्र शिवाजी महाराजांची प्रतिमा मलिन करणाऱ्या मराठा सैनिकांनी सेनापती पाटील यांचा अपमान केला. त्यामुळे येसाजी व्यथित झाले. मराठे आणि बेलवडीचे सैन्य यांच्यात संघर्ष सुरू झाला. याच वेळी राणी मल्लम्माने तिच्या महिला सैनिकांसह गनिमी काव्याचा वापर करत मराठा सैनिकांवर चढाई करत आपली गुरे परत मिळवली. या हल्ल्यात २०० मराठा सैनिक जखमी झाले आणि १२ सैनिक ठार झाले.

ही बातमी महाराजापर्यंत पोहोचली, तेव्हा ते आपल्या सैनिकांच्या असभ्य वर्तनाने संतापले. त्यांनी आपल्या सैनिकांची खरडपट्टी काढली. मात्र महिला सैनिकांनी आपल्या जवानांना मारहाण केल्याने ते तितकेच व्यथित झाले होते. युद्धशास्त्राप्रमाणे प्रतिष्ठा मिळवणे गरजेचे होते. आपली गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्याचा आदेश त्यांनी आपल्या सेनापतीस दिला. येसाजीच्या नेतृत्वाखालील सैन्याने मराठा सैन्याला तीव्र प्रतिकार केला. ही लढाई १५ दिवस चालली. दरम्यान, बेलवडी किल्ल्यातील रसद संपली. येसाजीला समोरासमोर लढाई करणे भाग होते. लढाई करताना येसाजी घोड्यावरून पडून रणांगणावर मरण पावला. जेव्हा ही धक्कादायक बातमी मल्लम्मापर्यंत पोहोचली, तेव्हा तिचे मूल फक्त चार महिन्यांचे होते. तरीही ती खचली नाही; तिने लढा चालू ठेवला. तिच्या नेतृत्वाखाली, बेलवडी सैन्याने आणखी २७ दिवस किल्ल्याचे रक्षण केले.

प्रख्यात इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या ‘शिवाजी अँड हिज टाइम्स’ या ग्रंथात राणीचा उल्लेख बेलवाडीच्या सावित्रीबाई असा केला आहे, ते लिहितात, “तिच्या किल्ल्याला ताबडतोब वेढा घातला गेला. पण तिने २७ दिवस त्याचे रक्षण केले. मात्र शेवटी मराठा सैन्याने किल्ला जिंकला. या पराक्रमी राणीला तिच्या मुलासह महाराजांसमोर आणले गेले. छत्रपती शिवाजी महाराज मल्लम्मा राणीच्या पराक्रमाने भारावले. त्यांनी राणीचा यथोचित सत्कार केला आणि तिला योग्य सन्मानाने वागवले. राजांच्या या कृतीने राणी आश्चर्यचकित झाली. प्रचलित कथेनुसार, महाराजांना तिच्यामध्ये जगदंबेचे रूप दिसले आणि त्यांनी तिला नमस्कार केला. मराठा सैनिकांच्या अयोग्य कृतीबद्दल खेद व्यक्त केला आणि महाराजांनी मल्लम्माला तिचे राज्य परत केले. तिचा अपमान करणाऱ्यांना महाराजांनी शिक्षा केली. शिवाजी महाराजांनी दुष्कृत्य करणाऱ्या सकुजी गायकवाडला फटकारले आणि शिक्षा केली. एखाद्या विजयी राजाने आपल्याच सरदाराला एका स्त्रीचा, जी त्याची कैदी होती तिचा अपमान केल्याबद्दल शिक्षा केल्याचे उदाहरण इतिहासात क्वचितच पाहिले जाऊ शकते.

मल्लम्माही महाराजांच्या परोपकाराने प्रभावित झाली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ, राणीने आपल्या राज्याच्या चारही कोपऱ्यांमध्ये शिवाजी महाराजांचे शिल्प कोरण्याचे आदेश दिले. यादवाड येथे आजही असे एक शिल्प अस्तित्वात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गौरवलेली ही पराक्रमी राणी आज इतिहासाच्या पानात दडून गेली आहे. इतिहास अशा आदर्श राजामुळे आणि अशा पराक्रमी राणीमुळे समृद्ध आहे. धन्य ते स्त्रीचा सन्मान करणारे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज…!

theladybosspower@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -