विधानसभा निवडणुकीपूर्वी जर घड्याळ चिन्हाबाबत निर्णय लागणार नसेल,तर ते चिन्ह गोठवण्यात यावे,व फुटीर गटाला दुसरे चिन्ह देण्यात यावे,अशा आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
दीपक मोहिते
मुंबई: गेल्या आठ ते दहा दिवसापासून अजित पवार गटावर एकामागोमाग संकटे कोसळत असून भाजपचे आ.नितेश राणे यांनी त्यांची पळता भुई थोडी केली आहे.तर दुसरीकडे शरद पवार यांनीही अजित पवार यांचा गळा पकडण्यास सुरवात केली आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी जर घड्याळ चिन्हाबाबत निर्णय लागणार नसेल,तर ते चिन्ह गोठवण्यात यावे,व फुटीर गटाला दुसरे चिन्ह देण्यात यावे,अशा आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.त्यामुळे अजित पवार गट सध्या अडचणीत आला आहे.
एकीकडे काका आपल्याला अडचणीत आणण्यासाठी सतत जाळे फेकत असतो,तर दुसरीकडे नितेश राणे हे ” आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नये,” असा दम भरू लागले आहेत.त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व अजित पवार यांचा चांगलाच कोंडमारा झाला आहे.शिंदे गट व भाजपच्या आमदारांनी अजित पवार गटावर तोंडसुख घेण्याचे प्रकार सूरु केले आहेत.शिंदे गटाच्या तानाजी सावंत यांनी तर ” मला उलटी होते,” असे सांगून अजित पवार गटाची लक्तरेच वेशीला टांगली.हे सारं घडत असताना शरद पवार गटाचे अमित कोल्हे यांनी ” अजित पवार यांनी निदान आता तरी सत्तेतून बाहेर पडावे,” असे आवाहन करून अजित पवार यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
पावलोपावली अपमान सहन करत तटकरे व अजित पवार कसेबसे एकेक दिवस पुढे ढकलत आहेत.महायुतीच्या जागावाटपातही त्यांची कुचंबणा होण्याची शक्यता आहे.सध्या ते गुलाबी जाकीट घालून सर्वत्र फिरत आहेत,पण आ.नितेश राणे यांच्या भगव्या झंझावातापुढे त्यांचा गुलाबी रंग आता फिका पडू लागला आहे.अशा वेळी त्यांचे अनेक सहकारी तसेच त्यांची मुले आता ” सिल्व्हर ओक” वर जाऊन शरद पवार यांच्या पाया पडू लागल्यामुळे अजित पवार यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनेही अजित पवार गटाला सोबत घेतल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयाचा फटका आपल्याला बसला,असे संघाचे म्हणणे असून फडणवीस यांनाही आपल्या निर्णयाचा चांगलाच फटका बसला आहे.आजवरच्या सर्व निवडणुका या त्यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्या,पण ही निवडणूक लढवण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,रावसाहेब दानवे व पंकजा मुंडे या तिघांकडे सोपवण्यात आली आहे.दरम्यान संघाने अजित पवार गटाला सोबत घेण्याच्या फडणवीस यांच्या निर्णयाचे वर्णन ” असंगाशी संग,” असे केल्यामुळे अजित पवार गट सध्या विमनस्क स्थितीत सापडला आहे.