शहाजीबापू पाटील यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान
सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एका व्यासपीठावर येऊन पुत्र आदित्य ठाकरे यांच्या डोक्यावर हात ठेवावा आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना पन्नास खोके मिळाल्याचे सांगावे आणि मी पण माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो, की आम्हाला पन्नास खोके कोणाकडूनही मिळाले नाहीत. एकदा महाराष्ट्रातील जनतेसमोर सोक्षमोक्ष होऊनच जाऊ द्या, अशा शब्दांत सांगोल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.
आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यापासून खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिव्या घालण्याशिवाय दुसरे कोणतेही काम करत नाहीत.
राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे ठाकरेंचे अजिबात लक्ष नाही. शेतकरी, शेतमजूर, महिला असे राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडविण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत, त्यामुळे ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. या जळक्या वृत्तींनी हा नाटकाचा केलेला प्रकार आहे, असेही शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
निवडणुकीच्या तोंडावर असे नाटकासारखे प्रकार होत असतात. सध्या येणारी नाटके ही प्रचाराचा भाग जरी मानली तरी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नाटक हे त्यांनी केलेल्या कामावर आणि भविष्यात त्यांना महाराष्ट्र प्रगतिपथावर जाण्यासाठी जो वेध घ्यायचा आहे, हे या नाटकातून सांगण्यात आलेले आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेकडून येणारे नाटक हे फेक नेरिटिव्हचा भाग असणार आहे, असा टोलाही शहाजी पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यावर आधारित ‘मला काही सांगायचंय’ हे नाटक लवकरच येत आहे. त्याला प्रत्युत्तरादाखल शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडूनही ‘पन्नास खोके-एकदम ओके’ नावाचे नाटक आणण्याची तयारी सुरू आहे. त्यावरून ठाकरे व शिंदे गटात पुन्हा वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
उद्धव ठाकरे यापुढे मुख्यमंत्री होणार नाहीत
आम्हाला एकही जागा नको; पण मुख्यमंत्रिपद द्यावे, अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आता आलेले आहेत. पण, उद्धव ठाकरे हे यापुढे मुख्यमंत्री होणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, अशी भविष्यवाणीही शहाजी पाटील यांनी केली.