कधी होणार मतदान?
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीनंतर अवघ्या राज्याचे लक्ष विधानपरिषद निवडणुकांकडे (Vidhanparishad Election) लागले होते. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक आयोग (Election Commission) कधी निवडणूक घोषित करणार याची सर्वजण वाट पाहत होते. राजकीय पक्षांनी या जागांसाठी उमेदवारांची चाचपणी देखील सुरु केली. यानंतर अखेर ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्याचे वेळापत्रक समोर आले आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील वेळापत्रक असणार आहे,
२५ जून – निवडणूक आयोगाकडून अधिसचूना जारी केली जाईल.
२ जुलै – उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख.
३ जुलै – अर्जांची छानणी केली जाईल.
५ जुलै – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख.
१२ जुलै – मतदान पार पडेल व त्याच दिवशी निकाल जाहीर होईल.
१२ जुलै रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत यासाठी मतदान करता येईल. १२ जुलै रोजीच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
कोणते आमदार होणार निवृत्त?
विधानसभेच्या आमदारांनी मतदानाच्या माध्यमातून नियुक्त केलेल्या विधानपरिषदेच्या ११ आमदारांचा कार्यकाळ येत्या २७ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर अन्य व्यक्तींची आमदार म्हणून निवड केली जाईल. २७ जुलै रोजी कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांमध्ये विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), महादेव जानकर (भाजप मित्र पक्ष), अनिल परब (शिवसेना ठाकरे गट), मनीषा कायंदे (शिवसेना शिंदे गट), डॉ. वजाहत मिर्झा व डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), बाबाजानी दुराणी (राष्ट्रवादी), जयंत पाटील (शेकाप) या ११ आमदारांचा समावेश आहे.