जाणून घ्या नेमकं काय आहे कारण
मुंबई : कलाविश्वाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. आज पासून पुढचे दहा दिवस चित्रपटगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय महाराष्ट्रात किंवा बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीने घेतलेला नसून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये (Tollywood Industry) घेण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले. मात्र आता आणखी बड्या बड्या अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित होणार असताना सिनेमा हॉल (Cinema Hall) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे कारण?
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये वर्षाच्या सुरुवातीपासूनच काही हिट चित्रपट प्रदर्शित झाले. ‘हनुमान’ आणि ‘टिल्लू स्क्वेअर’ या चित्रपटांनी तर तुफान कमाई केली आहे. पण हे सिनेमे सोडले तर इतर चित्रपटांनी फारशी कमाई केली नाही. आताचे गेले दोन ते तीन महिने तमिळ फिल्म इंडस्ट्रीसाठी फार काही चांगले गेले नाहीत. त्यामध्ये आता लोकसभा निवडणूक आणि आयपीएल चालू असल्याने त्याचाही फटका बसत आहे. कारण अनेक चांगले चित्रपट असतानाही प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तेलंगणामधील सिंगल स्क्रिन थिएटर्स मालकांनी दहा दिवस थिएटर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, २५ मे रोजी काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये ‘लव्ह मी’, ‘गँग्स ऑफ गोदावरी’, ‘हरोम हारा’ आणि ‘सत्यभामा’ या चित्रपटांचा समावेश आहे. मर्यादित बजेटमध्ये बनवलेले हे छोटे चित्रपट आहेत. मात्र चित्रपटगृहे बंद राहिली तर हे चित्रपट कुठे प्रदर्शित होणार असा प्रश्न डोकावत आहे.