मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली दक्षिण मध्य मुंबईत गर्जना
मुंबई : ‘निवडणूक आली की काहीजण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अशी आवई उठवतात. मात्र मुंबईकरांच्या मतांवर डोळा ठेवून २५ वर्ष मुंबईची सत्ता उपभोगणाऱ्यांनी मुंबईसाठी काय केले?’, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची ही मुंबई आहे, ही महायुतीची मुंबई आहे. त्यामुळे जोवर चंद्र सूर्य आहेत तोवर मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही’, अशी गर्जना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी चेंबूर येथे आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
आपले सरकार आल्यानंतर मुंबईच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेतले. पहिला निर्णय घेतला दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबईचा निर्णय घेतला. मुंबईचे सुशोभिकरण केले जात आहे. आपला दवाखाना सुरु आहे. जागतिक दर्जाचे शहर करण्याचा प्रयत्न आपला आहे. कोळीवाड्यांचा विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मुंबईकर जो बाहेर फेकला आहे त्याला परत आणण्याचे काम आपले सरकार करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यासाठी राहुल शेवाळे यांना तिसऱ्यांदा संधी द्यायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी मतदारांना केले.
काँग्रेसने देशाची अधोगती केली
पुनर्विकासाचे रखडलेले प्रकल्प पूर्ण केले जातील. बेघर झालेल्या मुंबईकराला हक्काचे घर देण्याचे काम आपले सरकार करेल. येत्या २० तारखेला धनुष्यबाणातून मतांचा असा वर्षाव करा, की मशाल विझली पाहिजे आणि धनुष्यबाण मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. गेली ५० ते ६० वर्ष काँग्रेसने देशाला मागे नेण्याचे काम केले. देशाची अधोगती केली. २०१४ पूर्वी देशात बॉम्बस्फोट होत होते. त्यानंतर मात्र एकही बॉम्बस्फोट झाला नाही कारण या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मजबूत नेतृत्व लाभले आहे. आज भारत बोलतो आणि जग ऐकते. भारत मजबूर नाही तर मजबूत देश झाला आहे. वाराणसीमध्ये विकासाची गंगा वाहत आहे. काशी विश्वेश्वरात विकास दिसत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
महिलांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय
काँग्रेस आता म्हणते महिलांना एक लाख रुपये देऊ, पण महायुती सरकारने यापूर्वीच ती योजना सुरु केली. लेक लाडकी लखपती योजना, लखपती दिदी, महिला बचत गटांना कर्ज योजना, महिलांसाठी एसटीमध्ये सवलत देऊन सरकारने महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले. नवीन संसद भवन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.