नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या अर्थसंकल्पात (Union Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकरी’ हे सरकारचे प्राधान्य असल्याचे सूचित केले आहे. यातच महिलांसाठी विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. महत्वाची घोषणा म्हणजे आणखी ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
लखपती दीदी या योजनेतून महिलांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. केंद्र सरकारने हा महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे. ज्यातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातोय. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती योजनेचा उल्लेख केला होता. यामध्ये महिलांना आवश्यक आर्थिक ज्ञानासह सर्वसमावेशक आर्थिक साक्षरता कार्यशाळा देखील घेतल्या जातात. यामध्ये अर्थसंकल्प बचत गुंतवणूक आणि आर्थिक साधने याविषयी महिलांना ज्ञान दिले जाते.
त्याचबरोबर या योजनेतून सूक्ष्म कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ज्यातून महिला उद्योग शिक्षण किंवा इतर गरजा पूर्ण करू शकतात. तसेच जास्त स्त्रियांकडे गहाण ठेवण्यासाठी कोणतीही मौल्यवान वस्तू नाही. त्यांच्यासाठी ही कर्ज महत्त्वाची ठरतात. या योजनेअंतर्गत महिलांना तंत्रज्ञानाशी देखील जोडले जाते. कारण या योजनेत महिलांना डिजिटल बँकिंग सेवा, मोबाईल वॉलेट्स आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म चा वापर करून आर्थिक व्यवहार आणि व्यवस्थापन सोयीस्करपणे करण्यास प्रोत्साहन दिले जाते.
आतापर्यंत २ कोटी महिला लखपती बनल्या असून, येणाऱ्या काळात आणखी ३ कोटी महिलांना लखपतीदीदी बनवण्याचे लक्ष्य असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. नऊ कोटी महिलांचा समावेश असलेल्या ८३ लाख बचत गटांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. यामुळे एक कोटी महिलांना लखपती दीदी बनण्यास मदत झाली आहे.