हैदराबाद : वऱ्हाडींच्या जेवणाच्या पंक्तीमध्ये मटणाची नळी (Mutton Bone Marrow) नसल्यामुळे मुलाने चक्क लग्न मोडल्याची घटना तेलंगणामध्ये घडली आहे. वाद इतका वाढला की हे सर्व प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले. पोलिसांनी वरपक्षाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांची मध्यस्थीही कामाला आली नाही.
मुलगी निजामाबादमधील राहणारी आहे तर मुलगा जगतियाल येथील राहणारा आहे. नोव्हेंबरमध्ये मुलाच्या घरी साखरपुडा झाला. साखरपुड्यावेळी वधूकडच्या कुटुंबियांनी वर पक्षाच्या लोकांसाठी आणि उपस्थित सर्व पाहुण्यांसाठी मांसाहारी जेवणाची व्यवस्था केली. पण मटणाची नळी पंक्तीला नव्हती, यावरुन वधू आणि वर पक्षाचे जोरदार भांडण झाले.
वाद इतका वाढला की अखेर पोलिसांना बोलवावे लागले. यावेळी पोलिसांनी, वर पक्षातील लोकांना वाद थांबवण्याचा सल्ला दिला, पण वाद काही केल्या संपला नाही. ते म्हणाले की, ज्यावेळी सर्व बोलणी झाली तेव्हा मटणाची नळी पंक्तीत असेल, असे ठरले होते. पण ही गोष्ट मुद्दाम लपवली गेली. अखेर, मुलाकडील मंडळींनी हे लग्न मोडले, अन् साखरपुड्याचा कार्यक्रमही अर्ध्यावर सुटला. सर्वांनी घरी जाणे पसंत केले.
दरम्यान, अनेकांनी या घटनेवेळी तेलगू चित्रपटातील एक प्रसंग आठवल्याचे म्हटले. मार्चमध्ये रिलिज झालेल्या बालागम या चित्रपटात असाच प्रसंग होता. मटणाच्या बोन मॅरोवरून दोन कुटुंबात वाद होऊन लग्न मोडते, असा प्रसंग चित्रपटात दाखवण्यात आला होता. तसाच सेम प्रसंग येथेही घडला.