मायभाषा: डॉ. वीणा सानेकर
“स्वत:साठी जगलास, तर मेलास
दुसऱ्यासाठी जगलास, तर जगलास”
हे अनंत काणेकर यांचे शब्द! आपला निश्चय, ध्येय आणि ऊर्जा सोबत घेऊन सरळसाधी माणसे आपला प्रवास करतात. त्या प्रवासात माणसे जोडून घेतात आणि आपल्या अस्तित्वाला माणूस म्हणून अर्थ देतात. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे कै. शशिकांत अणावकर. ११ ऑगस्ट १९३८ रोजी कुडाळ तालुक्यातील अणाव गावात एका सामान्य पण लोककल्याणाचा वारसा सांगणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पित्याकडून शिक्षणाची आस्था परंपरेनेच जणू लाभली. कोकणचा हा सुपुत्र आपल्या भूमीतील विद्यार्थ्यांना-विद्यार्थिनींना शिक्षण मिळावे, म्हणून त्यांनी कोकणात अणाव येथे पणदूर विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, पद्मश्री वेंगुर्लेकर महाविद्यालय यांचा पाया घातला.
अणावकर सर म्हणजे एक असे व्यक्तिमत्व होते, ज्यांच्या सहवासात येणारा प्रत्येक माणूस त्यांच्या विचारांचे तेज पाहून भारावून जायचा. हे तेज शिक्षणाच्या ध्यासाने सतत कार्यरत माणसाच्या कामाचे होते. अणाव गावचे सरपंच म्हणून गावाच्या विकासात त्यांचे योगदान मोठे होते. २४ वर्षे त्यांनी हे
पद सांभाळले. शालेय शिक्षणासोबतच उच्च शिक्षणावर देखील त्यांनी लक्ष केंद्रित केले. यातूनच महाविद्यालयीन शिक्षणाची वाटचाल यातूनच घडली. पणदूर कनिष्ठ महाविद्यालय आणि वेंगुर्लेकर महाविद्यालय या संस्थांची जडणघडण हे याचेच उदाहरण आहे. अद्ययावत शिक्षण देणाऱ्या संस्था घडवताना दानशूरांचा शोध घेत आर्थिक उभारणी करणे सोपे नव्हते.
शिक्षणातली गुंतवणूक हे त्यांच्याकरिता एक सेवाभावी काम होते. शिक्षण हा आज व्यापार झाला आहे. पण अणावकर सरांची दृष्टीच निराळी होती. शिक्षक पिढ्या घडवतो यावर त्यांचा विश्वास होता. शिक्षकांसाठी त्यांच्या मनात आपुलकीची जागा होती, कारण ते स्वतः उत्तम शिक्षक होते. शिक्षणातील नवनवीन संकल्पना त्यांना आकर्षित करायच्या. काळानुरूप घडत जाणारे बदल ते समजून घेत. कल्पकतेने नव्या संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची धडपड करता यायला हवी म्हणून ते शिक्षकांना सतत प्रेरणा देत. वेताळबंबार्डे देवस्थानात अवघ्या ४० विद्यार्थ्यांसह अणावकरांची शाळा सुरू झाली. या रोपट्याचा वटवृक्ष व्हावा म्हणून त्यांनी अविरत काम केले. जबाबदारी स्वीकारून अनेक दिशांनी शाळेचा विस्तार केला.
बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत,जणू रुजावे बियाणे माळरानी परसात… उपेक्षित वंचित मुलांना शिक्षणाचे वरदानच पुढे जाण्यास प्रेरक ठरू शकते, हे त्यांनी जाणले होते. १९६० साली त्यांनी गावातील मुलांकरिता शिक्षणाचे बीज रुजवले. त्या काळी ग्रामीण भागात आजच्यासारख्या शिक्षणाच्या सोयीसुविधा नव्हत्या. शिक्षक ते सचिव ते संस्थेचे अध्यक्ष असा प्रवास करत सरांनी इवल्याशा रोपाचा वेल गगनावर नेला.
वयाच्या ८५व्या वर्षी अस्सल कोकणाच्या मराठी मातीतला हा अनेकांचा आधारवड हरपला म्हणून पणदूरतिठा येथील बाजारपेठ, रिक्षा, टेम्पो व्यवसाय बंद ठेवण्यात आल्या, यातून अणावकर सरांचा मोठेपणा सहज लक्षात येतो. आयुष्य शिक्षणासाठी वेचल्यावर मृत्यूनंतर वैद्यक महाविद्यालयास अभ्यासाकरिता देहदान करणाऱ्या या अणावकर सरांना अभिवादन! आपण सर्वच माणसे असतो. माणसांचे पाय मातीचे हे सर्वविदित आहे. शशिकांत अणावकरांसारखी माणसे त्यांच्या कर्तृत्वाने देवमाणसे ठरतात.