नवी दिल्ली : गुजरातमधील गोध्रा येथे २००२ साली साबरमती एक्स्प्रेसला आग लावणाऱ्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ८ दोषींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर चार दोषींना जामीन देण्यास नकार दिला आहे. जामिनाच्या अटी पूर्ण केल्यानंतर उर्वरितांची जामिनावर सुटका करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने गोध्रा प्रकरणातील दोषींच्या जामीन प्रकरणावर निर्णय दिला. जामीन मिळालेले ८ दोषी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. दोषींचे वकील संजय हेगडे यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर त्यांना जामिनावर सोडण्याचे आवाहन केले.
२००२ च्या गोध्रा साबरमती एक्स्प्रेस ट्रेनमध्ये ५९ जणांना जिवंत जाळल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अब्दुल रहमान धंतिया, अब्दुल सत्तार इब्राहिम गड्डी यांच्यासह २७ दोषींच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली.
त्यांना कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, परंतु नंतर उच्च न्यायालयाने त्याचे जन्मठेपेत रूपांतर केले. या सर्व दोषींना १७ ते २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, ज्या दोषींना कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, परंतु उच्च न्यायालयाने त्यांचे जन्मठेपेत रूपांतर केले होते, त्यांच्या जामीनाचा विचार केला जाणार नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने एका आरोपीच्या पत्नीला कॅन्सरमुळे अंतरिम जामिनाचा कालावधी वाढवला होता.