मुंबई (प्रतिनिधी) : रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. आधीचाच रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता वाढणार नाही. महागाई आटोक्यात येत असल्याने आरबीआयच्या रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.
सध्या आरबीआयचा रेपो रेट ६.५० टक्के आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर देशाच्या मध्यवर्ती बँकेसमोर अजूनही अनेक आव्हाने आहेत. आमचे काम अजून संपलेले नाही. जोपर्यंत महागाई दर आरबीआयने ठरवून दिलेल्या लक्ष्याच्या जवळपास किंवा त्याखाली येत नाही तोपर्यंत आम्हाला अथक प्रयत्न करावे लागतील. रेपो रेटमध्ये शेवटची वाढ ८ फेब्रुवारी २०२३ ला करण्यात आली.
रेपो रेट म्हणजे काय?
ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेते त्या दराला रेपो दर म्हणतात. रेपो दर वाढणे म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे. तर, रेपो रेट कमी होणे म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. याचाच अर्थ आरबीआयने रेपो दरात वाढ केली तर सामान्यांच्या कर्जात वाढ होते.
रेपो रेटमधील वाढीचा कसा परिणाम होतो?
रेपो रेट मध्ये वाढ झाल्याने कर्जाचा हफ्ताही महागतो. यामुळे जर तुम्ही फ्लोटिंग रेटवर गृह कर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज घेतले असेल तर त्याचा ईएमआय वाढेल. दुसरीकडे रेपो रेटमध्ये वाढ झाल्यांतर बँक एफडीसह इतर ठेवींवर अधिक व्याज देऊ शकतात म्हणजेच ठेवींचे दर वाढू शकतात