कोल्हापूर : भाजपसोबत युतीत राहून आमची पंचवीस वर्षे सडली, असं म्हणाऱ्यांचे दोन्ही काँग्रेससोबत गेल्यावर अस्तित्व संपले आहे. आता त्यांना पुन्हा राजकारणात उठता येणार नाही असा सणसणीत टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. कोल्हापुरातील भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व्यासपीठावर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, कोल्हापूरात एकदा रणशिंग फुंकले की त्याचा वणवा महाराष्ट्रात पेटतो. म्हणूनच भाजपच्या विजयी मेळाव्याची सुरुवात कोल्हापूरातून केली जात आहे. गेल्या निवडणूकीत प्रचाराचा प्रारंभ ही आम्ही कोल्हापूरातून केला आणि त्यानंतर आम्हाला ४१ जागा मिळाल्या. तेच लक्ष्य घेवून आम्ही आगामी लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.
लोकसभेला चांगले यश मिळाले परंतू विधानसभेला जरा गडबडी झाल्या त्यामुळे पुरेसे यश मिळाले नाही. त्याची दुरुस्ती या निवडणुकीत करायची आहे. आमदारांनी खासदारांना निवडून आणायचे आहे आणि खासदारांनी आमदाराना विजयी करायचे आहे, हे ध्येय लक्षात घेवून मैदानात उतरायचे आहे. निकालानंतर पुन्हा विजयी मेळावा आम्ही याच कोल्हापूरात घेवू, असाही विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.