कोलकाता (वृत्तसंस्था) : रणजी ट्रॉफी २०२३ या सीझनचा अंतिम सामना रविवारी कोलकातातील ईडन गार्डन्स येथे खेळवण्यात आला. आजच्या या अंतिम सामन्यात सौराष्ट्रच्या संघाने ९ विकेट्सने बंगाल संघावर दणदणीत विजय मिळवत ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. तब्बल ३ दशकांनंतर बंगालचे रणजी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न सौराष्ट्रने धुळीस मिळवले. सौराष्ट्र संघ पुन्हा एकदा रणजी चॅम्पियन ठरला आहे. कर्णधार जयदेव उनाडकटने बंगालविरुद्ध घातक गोलंदाजी करताना आपल्या संघाला ट्रॉफी जिंकून दिली.
सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकटने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. बंगालचा संघ पहिल्या डावात ५४.२. षटकात १७४ धावांत गुंडाळल्याने, कर्णधाराचा निर्णय योग्य ठरला. बंगालकडून शाहबाज अहमदने ६९ आणि अभिषेक पोरेलने ५० धावा केल्या. सौराष्ट्रकडून जयदेव उनाडकट आणि चेतन साकारिया यांनी ३-३ बळी घेतले. चिराज जानी आणि डी जडेजा यांना २-२ बळी मिळाले.
सौराष्ट्र संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्यांना चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र, ४ फलंदाजांनी अर्धशतके झळकावली, ज्याच्या जोरावर सौराष्ट्रच्या संघाने ४०४ धावा केल्या. सौराष्ट्रतर्फे वासवडा याने ८१ धावा, चिराज जानीने ६० धावा, शेल्डन जॅक्सनने ५९ धावा आणि हार्विक देसाईने ५० धावा केल्या. बंगालकडून मुकेश कुमारने ४ तर आकाश दीप आणि ईशान पोरेलने ३-३ बळी घेतले.
त्याचवेळी बंगालचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्यांना प्रथम २३० धावांची आघाडी गाठावी लागली. प्रत्युत्तरात संघ २४१ धावांत गारद झाला. ज्यामुळे चौथ्या दिवशी सौराष्ट्रला १२ धावांचे लक्ष्य होते, ते सौराष्ट्राने सहज गाठले. जयदेव उनाडकटने दुसऱ्या डावात बंगालचे ६ फलंदाज बाद केले. या सामन्यात सौराष्ट्रने ९ विकेट्सने विजय मिळवला. जयदेव उनाडकटच्या सौराष्ट्र संघाने अंतिम फेरीत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. चेंडू आणि बॅट या दोन्ही युनिटमध्ये सौराष्ट्रच्या संघाने बंगालवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. गोलंदाजांनी बंगालचा पहिला डाव १७४ धावांत गुंडाळला.
उनाडकट, चेतन साकारिया यांनी ३ – ३ विकेटस् घेतल्या, तर चिराग जानीला २ विकेट्स मिळवण्यात यश आले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या सौराष्ट्राने हार्विक देसाई, शेल्डन जॅक्सन, अर्पित आणि चिराग जानी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आपल्या डावात ४०४ धावा केल्या. सौराष्ट्रने पहिल्या डावातच बंगालवर दडपण आणले होते. मनोज तिवारीचा संघही या दबावाखाली आला, त्याचा परिणाम त्यांच्या दुसऱ्या डावात दिसून आला. बंगालचा संघ दुसऱ्या सामन्यात केवळ २४१ धावा करू शकला.