Thursday, April 24, 2025

तेजशलाका

आपल्या समाजात अशा काही व्यक्ती असतात की, त्यांना स्वत:च्या संसारासोबत काहीतरी करून दाखविण्याची ऊर्मी, इच्छा असते. समाजाच्या ठाशीव प्रवाहाविरुद्ध पोहोण्याची ताकद त्यांच्यात येते कुठून? कदाचित त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, जडण-घडण, संस्कार व जिद्द या गोष्टी कारणीभूत असाव्यात.

आपण सर्वसामान्य माणसे समाजातील लहान-मोठ्या, भल्या-बुऱ्या घटनांनी व्यथित तर होतो; परंतु यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे म्हणून आपण पुढच्या आयुष्याला लागतो. पण जेव्हा आपण अशा व्यक्तींचे काम पाहतो, वाचतो तेव्हा क्षणभर थबकतो व आपल्याला त्याची जाणीव होते. घराच्या उंबरठ्याच्या आतील जग व बाहेरील विश्व यात खूपच तफावत आहे. घराच्या आतील सुरक्षिततेचे कवच फोडून कधी प्रवाह प्रवाहात, तर कधी प्रवाह विरुद्ध झोकून द्यायची ताकद या व्यक्तींमध्ये जाणवते. काहीशा प्रसिद्धीच्या वलयापासून दूर. पण देशासाठी, शोषितांसाठी, मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या या तेजशलाका म्हणूनच आगळ्यावेगळ्या आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी थोडसं.

निर्मला निकेतन, मुंबई येथे एम. एस. डब्ल्यू.चे शिक्षण घेतलेल्या उल्का महाजन या रायगड जिल्ह्यातल्या परिवर्तन या संस्थेत काम करू लागल्या, तेव्हा त्यांची ओळख कातकरी आदिवासींच्या समस्यांशी होत गेली. कातकऱ्यांना त्या जशा भेटत गेल्या तसे त्यांना शेतमजुरांच्या मजुरीच्या प्रश्नांबरोबर दळी जमिनीचा प्रश्न महत्त्वाचा आहे हे लक्षात आलं. कातकरी आदिवासींच्या बाबतीत ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा धाब्यावर बसवला गेला आहे. उल्काताईंच्या सर्वहारा आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न संघटनेने ऐरणीवर आणला. कातकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी त्यांच्या नावावर करणे हा सर्वहारा संघटनेचा मोठा लढा आहे. तहान-भूक विसरून अनेक अडचणींना तोंड देत उल्काताई व त्यांची संघटना काम करते आहे. कातकरी समाजाला त्यांच्या जमिनीसाठी न्याय मिळवून देणे यासाठीचा लढा लढताना प्रचंड सामर्थ्याची गरज होती.

जवळपास ७५ हजार लोकांसाठी उल्काताई व त्यांची संघटना अंदाजे दोन दशके लढत आहेत. शेतकऱ्यांना जमिनीचे हक्क मिळवून देऊन त्यांचे पुनर्वसन करणे, वीटभट्ट्यांवरील कामगारांची व स्थलांतरित मजुरांची संघटना बांधणे, रायगड जिल्ह्यातील दलितांना पाण्याचा समान हक्क मिळवून देणे या कामात उल्काताईंनी स्वतःला झोकून दिले आहे.
‘कोसळता गावगाडा २०१५’ व ‘कार्य आणि कार्यकर्ते’ (आत्मकथन) ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. उल्का म्हणजे पृथ्वीवर पडलेला तारा. तेजस्वी ताऱ्याप्रमाणे दिशादर्शकाचे कार्य उल्काताई करत आहेत. रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागातील लोकांसाठी १९८९मध्ये त्यांनी काम सुरू केले. या जिल्ह्यातील कातकरी आदिवासींचा पिढ्यान पिढ्या कसलेल्या जमिनीवर हक्क नाही. या जमिनीच्या कागदपत्रांवर त्यांचे नावच नाही. इथल्या आदिवासींचा पारंपरिक व्यवसाय कात पाडण्याचा; परंतु जंगलतोडीमुळे ते काम बंद पडले व आदिवासींवर उपासमारीची वेळ आली. चरितार्थासाठी दुसऱ्याच्या जमिनीवर, शेतात वेठबिगारी करून वर्षानुवर्षे ते शोषणाचे बळी ठरू लागले. यासाठी उल्काताई व त्यांच्या संघटनेने केलेले काम नक्कीच स्तुत्य आहे.

अशाच एक हटके काम करणाऱ्या डॉ. सुनंदा अवचट. डॉ. सुनंदा अवचट या एक कुशल मानसोपचारतज्ज्ञ होत्या. हजारो लोकांना आपलसं करणाऱ्या, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापक डॉ. अनिल अवचट यांच्या पत्नी. एक मानवतावादी स्त्री. त्यांच्या कामाचा उरक, त्यांचं वागणं, त्यांचे समतोल विचार सारं काही झपाटल्यासारखं. डॉ. अनिल अवचटांनी समाजातल्या उपेक्षित वंचित लोकांना जवळून पाहिलं. विणकर, भटके दल हमाल, मजूर, खाण कामगार, वाघ्या, मुरळ्या यांच्याविषयी त्यांनी लिहिलं. त्यांना मनसोक्त सामाजिक कार्य करून देण्यासाठी डॉ. सुनंदा यांचा प्रचंड
पाठिंबा होता.

देशातील पहिले व्यसनमुक्ती केंद्र ‘मुक्तांगण’ याची त्यांनी स्थापना केली. महिला फायटर पायलट स्कीम (योजना) प्रायोगिक तत्त्वावर २०१६ मध्ये सुरू झाली. तेव्हा सुरुवातीला केवळ तीनच महिला होत्या; परंतु नंतर त्यांची संख्या वाढू लागली. आता जवळपास १६ महिला आहेत. भावना कांत, अवनी चतुर्वेदी व मोहना सिंग यांची पहिल्या महिला बॅचच्या फायटर पायलट म्हणून निवड झाली. मोहना सिंग या अशा फायटर पायलट आहेत की, ज्यांनी हॉक अॅडव्हान्स जेट मिशन पूर्ण केले. या बॅचमधील दुसऱ्या महिला म्हणजे भावना कांत. भावनांचा जन्म १९९२ मध्ये बिहार येथील दरभंगामध्ये झाला. त्यांना लहानपणापासून पेंटिंग, खो-खो व बॅडमिंटनची आवड होती. फायटर पायलट बनण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे नोकरी सोडून त्यांनीदेखील एअर फोर्स अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. १६ मार्च २०१८ मध्ये त्यांनी मिग-२१ बायसन एकटीने उडवले होते. या दोघींसोबत अवनी चतुर्वेदीदेखील आहेत. भारतीय वायुसेनेत प्रथमच भारतीय महिलांनी वैमानिक लढाऊ विमाने चालविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. भावना कांत, मोहना सिंह व अवनी चतुर्वेदी या तीन लढाऊ महिला वैमानिकांनी हा मान १८ जून विशेष २०१६ मध्ये पटकावला होता.

अवनी चतुर्वेदी यांनी राजस्थानमधील वनस्थळी विद्यापीठातून बी.टेक. पूर्ण केले. त्यांचा भाऊ हा इंडियन आर्मीमध्ये आहे. त्यामुळे त्यांनाही वायुसेनेमध्ये सामील होण्याची इच्छा होती. अवनी यांनी मिळालेली नोकरी सोडून एअरफोर्स अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी गुजरातच्या जामनगर येथून मिग-२१ने उड्डाण भरली. त्यांनी एकटीने ही उड्डाण भरली होती.

अशा या असाधारण कर्तृत्ववान महिलांच्या कर्तृत्वातून, साहसातून तरुण-तरुणींनी खूप शिकण्यासारखे आहे. सुखोई, मिराज, जॅग्वॉर व मिग यासारखी युद्ध विमाने या फायटर पायलट उडवतात. अत्यंत खडतर प्रशिक्षणाला त्यांना सामोरे जावे लागते. अशा या तेजशलाकांची ऊर्मी, धडाडी, आव्हाने पेलवण्याची क्षमता आपण आपल्यातही उतरवूया.

-पल्लवी अष्टेकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -