Friday, April 25, 2025
Homeमहत्वाची बातमी'मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर व्हावे'

‘मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर व्हावे’

‘प्रहार’ दिवाळी अंकाचे नारायण राणे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : देशाच्या व आंतरराष्ट्रीय नकाशावर मुंबईचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, हे लक्षात घेऊन मुंबईचा विकास आंतरराष्ट्रीय दर्जाचा असला पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री व दैनिक ‘प्रहार’चे सल्लागार- संपादक नारायण राणे यांनी व्यक्त केली. प्रहारच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन रविवारी मुंबईत राणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रहारचे महाव्यवस्थापक मनिष राणे, संपादक डॉ. सुकृत खांडेकर, प्रशासन व लेखा विभागाचे प्रमुख ज्ञानेश सावंत, जाहिरात व्यवस्थापक दिनेश कहार, डेप्युटी मॅनेजर जाहिरात कौशल श्रीवास्तव, वितरण व्यवस्थापक शाहिद अख्तर, आयटी सेलप्रमुख राकेश दांडेकर, बिझनेस एडिटर रजनीकांत त्रिपाठी, विभागीय वरिष्ठ अधिकारी किशोर उज्जैनकर, सर्क्युलेशन एक्झिक्युटिव्ह सुरेश जाधव, रमेश मोरे आदी उपस्थित होते.

दैनिक ‘प्रहार’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन रविवारी मुंबईत केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रहारचे महाव्यवस्थापक मनिष राणे, संपादक डॉ. सुकृत खांडेकर, प्रशासन व लेखा विभागाचे प्रमुख ज्ञानेश सावंत, जाहिरात व्यवस्थापक दिनेश कहार, वितरण व्यवस्थापक शाहिद अख्तर, आदी प्रहारमधील वरिष्ठ उपस्थित होते. (छाया : अरूण पाटील)

प्रहारने आगामी महापालिका निवडणूक हा विषय घेऊन दिवाळी अंक प्रसिद्ध केला आहे. श्री. नारायण राणे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मुंबईचे वास्तव कसे आहे, हे उदाहरणासह सांगितले. मुंबईतील घडामोडींकडे सर्व देशाचे लक्ष असते. मुंबईत उद्योग, व्यापार, व्यवसायासाठी सर्व देशांतून लोक येतात. आर्थिक क्षेत्रात मुंबईने आपले स्थान कायम अव्वल ठेवले आहे. देशाच्या राजधानीतही महाराष्ट्राला, मुख्यमंत्र्यांना मोठे आदराचे स्थान दिले जाते. देशाच्या तिजोरीत चौतीस टक्के महसूल मुंबईतून येतो. त्यामुळे या महानगराची विशेष काळजी घेतली पाहिजे. जगात अनेक शहरे नियोजनबद्ध उभी राहिली. मग मुंबई स्वच्छ, सुंदर आणि नियोजनबद्ध का दिसत नाही? मुंबईत असंख्य उड्डाणपूल उभे राहिले, पण त्या पुलाखाली अनधिकृत व्यवसाय व भिकारी यांचा विळखा पडला आहे. आपण मुख्यमंत्री असताना तत्कालीन मुंबई महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना बरोबर घेऊन मुंबईचा फेरफटका मारला होता. कुठे अस्वच्छता आहे, कुठे बकालपणा आहे, हे आपण त्यांच्या नजरेला आणून दिले होते.

पोलीस ठाण्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन सर्वसामान्य लोकांना तिथे चांगली वागणूक कशी मिळेल, अशी तेथील व्यवस्थेत सुधारणा केली होती. जेलमध्ये दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेल्या कैद्यांना जेवणाचे मोठाले डबे बंद करण्याचा निर्णय झाला होता. प्रशासनात कठोर शिस्त असली पाहिजे, यावर आपला कटाक्ष होता. मुंबईच्या नागरी सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष होत राहिले, तर मुंबईचे नुकसान होईल व त्याचे परिणाम मुंबईकरांना भोगावे लागत आहेत. मुंबई वैभवशाली कशी बनवता येईल आणि मुंबईची प्रतिष्ठा कशी जपता येईल, असा आराखडा नियोजनबद्ध राबवला पाहिजे, असे मत राणे यांनी व्यक्त केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -