अलिबाग (वार्ताहर) : गौरी-गणपतीचा सण जवळ येऊन ठेपल्याने रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. पिठोरी, गौरी तसेच गणपतीच्या पुजेसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तुही बाजारात दाखल झाल्या असून, पिठोरी, गौरींच्या पुजेसाठी लागणारी सुपेही बाजारात दाखल झाली आहेत.
रायगड जिल्ह्यात काही ठराविक तालुक्यांमध्ये बुरुड समाज सुपे तयार करीत असले तरी बरीचशी सुपे ही रायगड जिल्ह्याबाहेरील पुणे जिल्ह्यातून येत असतात. सुप बनविण्यासाठी लागणाऱ्या बांबुचे वाढते दर, कारागिरांची वाढती मजुरी पहाता, पूर्वीपेक्षा कैकपटीने सुपांचे दर वाढले आहेत.
पुणे जिल्ह्यातील शिवापुरच्या गावच्या सुपविक्रेत्या लता दत्तात्रय सकपाळ सध्या अलिबाग शहरात सुप विक्रीच्या व्यवसाय करीत आहेत. त्यांचा सुप तयार करून त्यांची विक्री करणे, हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय असून बारमाही ते सुप विक्रीचा व्यवसाय करतात. अलिबाग व पोयनाड येथेही त्यांचे कुटुंब सुपविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे सांगताना १९८४ साली त्यांचे लग्न झाले त्यावेळी त्या २५ रुपयांना एक सुप विकायच्या; परंतु सध्याची वाढती महागाई, तसेच सुप बनविण्यासाठी लागणाऱ्या बांबुचे वाढते दर, कारागिरांची वाढती मजुरी पहाता, पूर्वीपेक्षा कैकपटीने सुपांचे दर वाढले आहेत. त्यामुळे सध्या एक सुप २०० रुपयांना विकण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील शिवापूर येथे त्यांच्या मालकीचे घर किंवा शेतजमीन नसल्याने गाव सोडून अन्य ठिकाणी सकपाळ कुटुंब भाड्याने राहतात. सुपविक्रीच्या व्यवसावरच कुटुंबाला पोट भरावे लागते. वर्षभरात ४०० ते ५०० सुपांची विक्री होते, असेही त्या म्हणाल्या. सुपांची विक्री करताना पोलिसांचा किंवा समाजकंटकांचा त्रास नसला तरी अलिबागला सुप विक्रीसाठी आम्ही जातो, तेव्हा तेथील स्थानिक भाजी विक्रेत्यांचा त्रास अधिक असल्याचे लता सकपाळ `दै. प्रहार’शी बोलताना सांगितले.