नवी दिल्ली : देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन संबोधित करताना देशातील महिलांचा अपमान होणाऱ्या घटना बंद व्हायला हव्यात, असे आवाहन केले. हेच आपले सर्वात मोठे टेन्शन असल्याचेही मोदींनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्यसाधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन नारी शक्तीच्या सन्मानावर अधिक भर दिला. “हम वो लोग हैं, जो जीव में शिव देखते हैं, हम वो लोग हैं, जो नगर में नारायण देखते हैं, हम वो लोग हैं, जो नारी को नारायणी कहते हैं, हम वो लोग हैं, जो पौधे में परमात्मा देखते हैं, हम वो लोग हैं, जो नदी को मां मानते हैं, हम वो लोग हैं, जो कंकड-कंकड में शंकर देखते हैं”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी यावेळी महिलांचा अपमानापासून मुक्तीचा संकल्प आपण केला पाहिजे, असेही म्हटले.
राष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महिलांचा अभिमान महत्त्वाचा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. स्त्रीचा अपमान करणे योग्य नाही. महिलांच्या सन्मानाचा देशाला अभिमान आहे. देशात महिलांचा सन्मान प्रत्येक परिस्थितीत आवश्यक आहे.
स्वावलंबी भारतीय समाजासाठी जनआंदोलन
आज जग पर्यावरणाच्या समस्येला तोंड देत आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्या सोडवण्याचा मार्ग आपल्याकडे आहे. यासाठी आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला वारसा आहे. स्वावलंबी भारत, ही प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक सरकारची, समाजाच्या प्रत्येक घटकाची जबाबदारी बनते. स्वावलंबी भारत, हा सरकारचा अजेंडा किंवा सरकारी कार्यक्रम नाही. ही समाजाची जनआंदोलन आहे, जी आपल्याला पुढे न्यायची आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
घराणेशाही संपवण्यासाठीच्या लढ्यात मला साथ द्या
भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही दोन देशापुढची सगळ्यात मोठी आव्हानं आहेत. भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवण्यासाठी आपल्याला साथ देण्याचे आवाहन मोदींनी केले आहे. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून आपल्या नवव्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटले की, भारतापुढील सर्वात मोठी दोन आव्हाने भ्रष्टाचार आणि घराणेशाही आहेत. भ्रष्टाचार देशाला पोखरत आहे आणि घराणेशाही राजकारणातूनही संधी हिसकावून घेत आहे.