नाशिक (प्रतिनिधी): कवी असल्याने नट म्हणून काम करत असताना संवेदनशील कवितांचा परिणाम हा अभिनयावर देखील होतो. त्यामुळे कवी आणि नट म्हणून भूमिका बजावत असताना कविता हा माझ्या जगण्याचा भाग बनलाय असे प्रतिपादन अभिनेते कवी किशोर कदम यांनी व्यक्त केले. नाशिक येथे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात ‘संवाद लक्ष्यवेधी कवींशी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात संवादक डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. गोविंद काजरेकर, कवी प्रफुल्ल शिलेदार, किशोर कदम, सुचिता खल्लाळ, खलील मोमीन, वैभव जोशी यांनी आपल्या कवितांविषयी व आपला जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. यावेळी कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, समन्वयक विश्वास ठाकूर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कवी किशोर कदम म्हणाले की, संवेदनशील भूमिका मांडण्यासाठी कविता अधिक उपयोगी ठरते. कविता लिहिणारा कवी यात स्त्री पुरुष भेद नको. जगण्याची भीती प्रत्येक कालावधीत होती. त्यामुळे मला देखील भीती वाटते, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आजूबाजूला जे घडत आहे ते कवितेत मांडले गेले पाहिजे असे मत सुचिता खल्ल्याळ यांनी व्यक्त केले. कवीतेत काव्य अतिशय महत्त्वाचे असते. मी कविता एन्जॉय करतो असे मत खलील मोमीन यांनी व्यक्त केले.
तर बाल कविता लिहिणे मला खूप अवघड वाटते कारण चौकटीच्या बाहेर जाऊन लिहिणे आवश्यक असते असे मत व्यक्त करत काही निवडक कवितांचे सादरीकरण केले