नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात भारत-चीनमध्ये झालेल्या संघर्षामुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले आहेत. भारताच्या सीमाभागात चीनकडून हालचाली वाढल्यामुळे भारतीय लष्कर चीनी लष्कराच्या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे इस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी स्पष्ट केले आहे.
चीनच्या सीमालगत चीनी सैन्याने गस्तीचे प्रमाण वाढवले आहे. तसेच सैन्याच्या विविध तुकड्यांचा सरावदेखील सीमाभागात वाढला आहे. त्यामुळे चीन पुन्हा भारतावर संर्घष करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताकडूनही चीनविरोधात कारवाईची तयारी करण्यात आली असल्याची माहिती, कमांडर मनोज पांडे यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा – भारत ‘जशास तसं उत्तर’ देण्यास सज्ज!
चीन लष्कर, वायूदलात सैन्यांची वाढ करत बऱ्याच काळापासून सीमाभागात तुकड्यांचा सराव करत आहेत. तसेच चीनकडून गस्तींचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे भारतीय लष्कराच्या इस्टर्न कमांडने पूर्ण तयारी केली असून संर्घषाला सामोरे जाण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचे कमांडर पांडे म्हणाले.
भारतीय लष्करानेही नियंत्रण रेषेजवळ गस्ती वाढवल्या आहेत. तसेच भारताकडे हिंसाचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी पुरेसे सैन्यबळही उपलब्ध आहे. गस्तीसाठी सर्वेलन्स ड्रोन्सचा वापर करण्यात आला असून अत्याधुनिक रडार यंत्रणा, संपर्क यंत्रणा आणि नाईट विझिबिलिटीसाठीची सामग्री भारताकडे उपलब्ध आहे, असे कमांडर मनोज पांडे यांनी सांगितले.