भाईंदर : मीरा- भाईंदर शहरात गेल्या आठवड्यात सुरु झालेल्या ‘पुनः धैर्य ‘योजने मार्फत ५० पेक्षा अधिक महिला अर्जदारांचे समाधान करण्यात आले आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मागच्या वर्षभरातील महिलांशी संबंधित गुन्ह्यांच्या आकडेवारीचे प्रमाण अधिक असल्याने पोलीस आयुक्तालयाकडून आता महिलांसाठी दर शनिवारी ‘पुनःधैर्य ‘ योजना राबवण्यात येत आहे. आयुक्तलायकडून मीरा-भाईंदर शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे.
महिलांवर होणारे अत्याचार तसेच इतर प्रकरणा बाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येते. त्यानंतर याप्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येते. काही प्रकरणांमध्ये महिला तक्रारदार व समोरच्या व्यक्तीमध्ये तडजोड करुन पोलिसांकडून प्रकरण निकाली काढण्यात येते. अशा प्रकरणांमध्ये काही दिवसानंतर तक्रारदार महिलेला पुन्हा त्रास दिला जाण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकार टाळण्यासाठी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मीरा भाईंदर शहरातील काशिमिरा, मीरा रोड, भाईंदर, नवघर, उत्तन, नयानगर असशी ६ पोलिस स्थानकांत ही योजना सुरु करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची योजना राबवली जात आहे. महिलांशी संबंधित घडणारे गुन्हे रोखण्याच्या दृष्टीने ही योजना महत्वपूर्ण ठरणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले यांनी सांगितले आहे.