‘झाडे दाखवा दहा हजार मिळवा’ : आदिवासी क्रांती सेनेचे आवाहन
मुरबाड : शासनाच्या वनविभागाने राबविण्यात आलेल्या पन्नास कोटी वृक्षलागवड योजनेचा (tree plantation campaign) मुरबाड तालुक्यात बोजवारा उडाला असून चारही वनपरिक्षेत्रातील लावलेल्या झाडांच्या जागी ओसाड उघडे बोडके माळरान दिसून येत आहे. त्यामुळे जंगलावरच आपली उपजीविका करणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या आदिवासी क्रांती सेनेने ‘झाडे दाखवा दहा हजार मिळवा’, असे आवाहन करून तीन वर्षांपूर्वी वृक्षलागवड केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
येथे वनविभागाचे चार वनपरिक्षेत्र असून मुरबाड पुर्व, मुरबाड पश्चिम, टोकावडे उत्तर व टोकावडे दक्षिण या चार वनपरिक्षेत्राअंतर्गत शेकडो हेक्टर वनजमिन येते. या चार वनपरिक्षेत्रात गेल्या २०१६-२०१९ या तीन वर्षांच्या कालावधीत पन्नास कोटी वृक्षलागवड योजनेतून मित्रवृक्ष लागवडीच उद्दिष्ट राबविण्यात आले होते. यात सागवान, ऐन, खैर, आवळा, जांभूळ या वृक्षाच्या लागवडीसाठी बाहेरून रोपे मागवून त्यांच्या लागवडीसाठी खड्डे खोदणे, मजूर लावून लागवड करणे, त्यांची देखभाल, त्यांना उन्हाळी संरक्षण, वेळोवेळी पाणी देण्यासाठी, त्यांची राखण करणे, निगा राखणे यासाठी राखणदार ठेवणे, लावलेल्या रोपांना खत, औषध फवारणी आणि वृक्ष संवर्धनासाठी महाराष्ट्र वनविभागाने या चारही वनविभागांना सतत तीन वर्षे निधी उपलब्ध करून दिला होता.
सन २०१६-२०१९ या तीन वर्षांत लागवड केलेली रोपे किमान चार ते सहा फुटांची व्हायला हवी होती; परंतु ज्या ठिकाणी लागवड केली ती जागा आजही उजाड असल्याने दर वर्षी त्याच खड्ड्यांमध्ये तीच रोपे लावण्याचे कागदावरील उद्दिष्ट साध्य झाले. मात्र जंगल वाढलेच नाही. मूळचे वाढलेले नैसर्गिक जंगल याच वनविभागाच्या संगनमताने जंगलतोड करणाऱ्यांना पाठिशी घालीत जंगल संपत्ती संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्थानिक आदिवासी आरोप करताना दिसत आहेत. तालुक्यातील कोणत्याही वनविभागाच्या वनपरिक्षेत्रात ही वृक्षलागवड केलेली व झाडे अस्तित्वात असलेली किमान एका एकरात जगवलेली झाडे दाखवा व दहा हजार रुपये मिळवा, असे आव्हान आदिवासी क्रांती सेनेने केले असून फक्त खड्डे करून वृक्षलागवड योजनेचा बोजवारा करणाऱ्या व बदली घेऊन पसार होणाऱ्या वनअधिकाऱ्यांच्या सखोल चौकशीची मागणी अदिवासी क्रांती सेनेने वनविभागाकडे केली आहे.
वृक्षलागवड उद्दिष्ट आता उरले नसल्याने नव्या लागवडीसाठी शासन निधी देत नाही. तालुक्यातील बारवी धरणाचा वनपट्टा, माळशेज घाटातील वनसंपदा, भिमाशंकर अभयारण्यातील मिल्हे, देहरी, खोपिवली, जायगाव तसेच पाटगांव, पठार, हरिश्चंद्रगड परिसर. गोरखगड, सिद्धगड हे जंगल लाकूडतोड्यांपासून जपले असते तरी वनसंपदा टिकवून ठेवता आली असती.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra