मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात गरोदर महिलेच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत प्रियकराने महिलेची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपीने शीतपेयामध्ये डांबराच्या गोळ्या मिसळून ते महिलेला पाजल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर आरसीएफ पोलिसांनी आरोपी प्रियकर आशिष मगर याला अटक केली आहे. (Mumbai Crime)
https://www.prahaar.in/2026/08/30/mandakini-river-in-chitrakoot-in-spate-ramghat-area-submerged-200-people-rescued/
कॉल्ड ड्रिंगमध्ये दिलं अन् थोड्याच वेळात....
पोलिसांच्या माहितीनुसार, 25 ऑगस्ट रोजी पीडित महिला आणि आशिष मगर यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला होता. काही वेळाने वाद शांत झाल्यानंतर आशिषने महिलेला शीतपेय पिण्यास दिले. या पेयामध्ये डांबराच्या गोळ्या मिसळल्या असल्याची माहिती महिलेला नव्हती. शीतपेय प्यायल्यानंतर काही वेळातच तिला उलट्या होऊ लागल्या आणि प्रकृती बिघडली.
सुरुवातीला कुटुंबीयांना तिची तब्येत बिघडल्याचे वाटले. मात्र, त्रास वाढत गेल्यानंतर महिला चक्कर येऊन खाली पडली. कुटुंबीयांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी तिला शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (Murder)
मृत्यूपूर्वी महिलेने शीतपेय प्यायल्यानंतरच आपली प्रकृती बिघडल्याचे कुटुंबीयांना सांगितल्याची माहिती आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर आशिषची चौकशी केली. सुरुवातीला त्याने पोलिसांना वेगवेगळी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. मात्र, चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.
महिला दोन ते अडीच महिन्यांची गरोदर असल्याचेही समोर आले आहे. वैद्यकीय तपासणीत विषबाधेमुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरसीएफ पोलिसांनी आशिष मगरविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ( Pregnant Woman Murder)