मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील नागरिकांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा देत गडचिरोलीच्या विकासाचा आढावा घेतला. “गडचिरोली आता माओवादमुक्त असून देशाचे ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येत आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. (CM Devendra Fadnavis)
गडचिरोलीचे आपल्या मनात विशेष स्थान असल्याचे सांगत फडणवीस यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. २०१४पासून जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे परिणाम आता दिसत असून, जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक येत असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या विकासामुळे गडचिरोलीसह लगतच्या परिसरातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (CM Devendra Fadnavis)
मेडिकल कॉलेज, विमानतळ आणि रेल्वे प्रकल्पांना वेग
गडचिरोलीमध्ये मेडिकल कॉलेज, विमानतळ, रेल्वेमार्ग, रस्ते आणि शिक्षणाच्या सुविधा यांसह विविध क्षेत्रांत विकासकामे वेगाने सुरू असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. मात्र, विकास करताना जल, जमीन, जंगल आणि पर्यावरणाच्या संवर्धनालाही समान महत्त्व दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोलीच्या विकास प्रक्रियेत जिल्ह्यातील नागरिकांनी दिलेल्या सहकार्याचे श्रेय त्यांना देत, पुढील काळातही नागरिकांच्या सहकार्याने जिल्ह्याच्या विकासात आणखी भर घालण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. (CM Devendra Fadnavis)
“माओवादाची ओळख पुसून विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गडचिरोलीला आता उद्योग आणि रोजगाराचे नवे केंद्र बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे,” असा संदेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यातून देण्यात आला. (CM Devendra Fadnavis)