Wednesday, August 26, 2026

Navnath Ban : संजय राऊत - राहुल गांधींच्या भेटीवरून भाजप आक्रमक; ‘उबाठा संपवण्याची सुपारी’ घेतल्याचा आरोप

Navnath Ban : संजय राऊत - राहुल गांधींच्या भेटीवरून भाजप आक्रमक; ‘उबाठा संपवण्याची सुपारी’ घेतल्याचा आरोप

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची घेतलेल्या भेटीवरून भाजपने गंभीर आरोप केले आहेत. उबाठा गट संपवून तो काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या कथित कटाचा भाग म्हणून ही भेट झाल्याचा दावा भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी केला आहे.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्या भेटीवरून जोरदार टीका केली. येत्या दोन वर्षांत उबाठा गट पूर्णपणे संपवून काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी कथित १० हजार कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यातील एक हजार कोटी रुपयांच्या कथित कमिशनच्या पहिल्या हप्त्याबाबत चर्चा करण्यासाठी राऊत यांनी राहुल गांधींची भेट घेतल्याचा दावा बन (Navnath Ban) यांनी केला.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका करणार नसल्याचा दावा :

नवनाथ बन (Navnath Ban) यांनी आणखी एक गंभीर दावा केला आहे. कथित सुपारी स्वीकारल्यानंतर संजय राऊत आगामी काळात राहुल गांधींचे कौतुक करतील आणि उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्याबद्दल काहीही बोलणार नाहीत, अशी हमी त्यांनी राहुल गांधींना दिल्याची माहिती असल्याचे बन यांनी म्हटले. मात्र, भाजपकडून करण्यात आलेल्या या आरोपांना आधार देणारे कोणतेही पुरावे पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले नाहीत.

मोदी विरुद्ध राहुल गांधीच्या नेतृत्वावरून टीका :

यावेळी बन (Navnath Ban) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची तुलना करत काँग्रेसवर निशाणा साधला. २०१४, २०१९ आणि २०२४ या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएने मिळवलेल्या यशाचा उल्लेख करत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली. महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली असल्याचा दावा करत त्यांनी काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवला.

मोदींच्या कामाच्या वेळेचा उल्लेख :

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातील १८ तास काम करत असल्याचा दावा करत बन (Navnath Ban) यांनी विरोधकांवर टीका केली. मोदींना विकसित भारत पाहायचा आहे, तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना उबाठा गटाची वाताहत झालेली पाहायची आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच २०२९ मध्ये राहुल गांधी पंतप्रधान होणार नसल्याचे लक्षात आल्यामुळे विरोधकांची झोप उडाली असल्याची टीकाही त्यांनी केली.

काश्मीरच्या मुद्द्यावरून राऊतांवर निशाणा :

काश्मीरच्या मुद्द्यावरूनही नवनाथ बन (Navnath Ban) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. काँग्रेसच्या काळात काश्मीरमध्ये असुरक्षिततेचे वातावरण होते, असा दावा त्यांनी केला. कलम ३७० हटवल्यानंतर परिस्थितीत बदल झाल्याचे सांगत त्यांनी भाजप सरकारच्या धोरणांचे समर्थन केले. संजय राऊत यांनी यापूर्वी काश्मीरला भेट देऊन तेथील सौंदर्याचे कौतुक केले होते, याची आठवण करून देत बन यांनी राऊतांना लक्ष्य केले. काश्मीरमध्ये आज मोठ्या संख्येने पर्यटक जात असून दगडफेकीच्या घटना कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >