मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून, पटकथा लेखक कल्याण बंदी यांनी नेटफ्लिक्स इंडिया आणि कंटेंट हेड मोनिका शेरगिल यांच्यावर त्यांच्या कथेची संकल्पना वापरल्याचा आरोप केला आहे. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी मद्रासचे शिक्षण घेतलेल्या कल्याण बंदी यांनी २०१९ मध्ये ‘गांधारी’ नावाची कथा लिहिली होती. ही कथा त्यांनी स्क्रीनरायटर्स असोसिएशनकडे नोंदवली होती. एका आईकडून बाल तस्करीच्या जाळ्यातून आपल्या मुलीची सुटका करण्यासाठी केलेल्या संघर्षाभोवती ही कथा असल्याचा त्यांचा दावा आहे. (Gandhari Film)
कल्याण यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी एप्रिल २०१९ मध्ये लिंक्डइनच्या माध्यमातून त्यावेळी वूटमध्ये कार्यरत असलेल्या मोनिका शेरगिल यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांच्या मागणीनंतर त्यांनी मोनिका यांना आठ पानांची कथा आणि दोन पानांचे सिनॉप्सिस पाठवले. मात्र, मे २०१९ मध्ये ही कथा त्यांच्या कामाची नसल्याचे सांगत ती नाकारण्यात आली.
मुंबई : मुंबई पोलिसांनी सलमान खानला लक्ष्य करणाऱ्या एका कथित खंडणीच्या कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे . या कटात एका व्यक्तीने व्हॉट्सॲप चॅट्स ...
त्यानंतर ‘गांधारी’ या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर आपल्या मूळ कथेतील संकल्पना वापरण्यात आल्याचे कल्याण यांचे म्हणणे आहे. डिसेंबर २०२४ मध्ये निर्मात्यांनी त्यांच्याकडून प्रकल्प गुपचूप परत घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यामुळे आपले आर्थिक आणि व्यावसायिक नुकसान झाल्याचे कल्याण यांनी म्हटले आहे.
४० लाख रुपयांची नुकसानभरपाई आणि क्रेडिटची मागणी
नेटफ्लिक्सकडून प्रतिसाद न मिळाल्यानंतर कल्याण यांनी स्क्रीनरायटर्स असोसिएशनचा सल्ला घेतला. त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांनी नेटफ्लिक्स इंडिया आणि मोनिका शेरगिल यांना कायदेशीर नोटीस पाठवली. या नोटीसमध्ये त्यांनी ४० लाख रुपये नुकसानभरपाई आणि कथेचे क्रेडिट देण्याची मागणी केल्याचे सांगितले.
कल्याण यांच्या दाव्यानुसार, नोटीस पाठवून ११ महिने उलटूनही त्यांना नेटफ्लिक्सकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही. नेटफ्लिक्सच्या मोठ्या कायदेशीर टीमविरोधात न्यायालयीन लढाई लढणे आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याने आपण कोर्टात जाण्याऐवजी सोशल मीडियावर हा मुद्दा मांडल्याचे त्यांनी सांगितले. (Gandhari Film)
निर्मात्यांकडून आरोप फेटाळले
दरम्यान, ‘गांधारी’ची लेखिका आणि निर्माती कनिका ढिल्लों यांच्या कथा पिक्चर्स या प्रोडक्शन हाऊसने कल्याण बंदी यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. ‘गांधारी’ हा पूर्णपणे मूळ प्रकल्प असून, त्याची कथा आणि पटकथा कनिका ढिल्लों यांनी स्वतः लिहिल्याचे निर्मात्यांनी अधिकृत निवेदनात स्पष्ट केले आहे. (Gandhari Film)
सोशल मीडियावर सुरू असलेल्या दाव्यांना सत्य मानण्यापूर्वी त्यांची पडताळणी करावी, असे आवाहनही प्रोडक्शन हाऊसने माध्यमे आणि प्रेक्षकांना केले आहे.
दरम्यान, नेटफ्लिक्स इंडिया आणि मोनिका शेरगिल यांनी या आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ‘गांधारी’च्या प्रदर्शनापूर्वी सुरू झालेल्या या कथित कॉपीराइट वादावर नेटफ्लिक्सची भूमिका काय असणार, याकडे आता लक्ष लागले आहे.






