नवी दिल्ली : १९८४ च्या भीषण शिखविरोधी दंगलीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार (Sajjan Kumar) यांचे गुरुवारी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. दिल्लीच्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
१९८४ च्या दंगलीतील मुख्य सूत्रधार
दिल्लीच्या राजकारणात जाट समाजाचा एक मोठा चेहरा म्हणून ओळखले जाणारे सज्जन कुमार हे ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शिखविरोधी दंगलीतील मुख्य चिथावणीखोर असल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आले होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीसह उत्तर भारतात उसळलेल्या दंगलीत हजारो शिख बांधवांची घरे, दुकाने आणि गुरुद्वारे जाळण्यात आले होते. या भीषण हिंसाचारात हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला होता.
वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ट्रॅफिक पोलिसांकडून सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जातात. असाच एक ...
३० वर्षांनंतर कसा आवळला गेला फास ?
विशेष म्हणजे दंगलीच्या घटनेनंतर तब्बल ३० वर्षे सज्जन कुमार यांचे नाव या प्रकरणातून बाहेरच राहिले होते. सुरुवातीला स्थापन करण्यात आलेल्या अनेक तपास आयोगांच्या अहवालातही त्यांचा थेट उल्लेख नव्हता. परंतु, २०१५ मध्ये केंद्र सरकारने शिखविरोधी दंगलींच्या जुन्या बंद पडलेल्या फाईल्स पुन्हा उघडण्यासाठी 'विशेष तपास पथक' (SIT) स्थापन केले आणि तेथून सज्जन कुमार यांच्याविरोधात कायदेशीर फास आवळला गेला.
न्यायालयाचे खटले आणि जन्मठेपेची शिक्षा
२०१८ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने पालम कॉलनी परिसरात पाच शिख नागरिकांच्या हत्येप्रकरणी सज्जन कुमार यांना प्रथम दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर २०२५ मध्ये, १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीच्या सरस्वती विहार भागात दोन शिख पुरुषांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने त्यांना पुन्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, जनकपुरी आणि विकासपुरी हिंसाचार प्रकरणातून पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती.
सज्जन कुमार यांची राजकीय कारकीर्द
सज्जन कुमार हे ७० च्या दशकापासून दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होते. १९७७ मध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. यानंतर १९८० पासून त्यांनी 'आऊटर दिल्ली' लोकसभा मतदारसंघातून तब्बल तीन वेळा काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केले होते. अखेर आयुष्याचा शेवटचा काळ तुरुंगात घालवल्यानंतर ८० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.