भारतीय स्वयंपाकात तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भाजीला फोडणी देण्यापासून ते पराठे आणि तळलेले पदार्थ बनवण्यापर्यंत तेल महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, चव वाढवणारे हेच तेल गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तेलाचा प्रकार निवडण्यासोबतच त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणेही महत्त्वाचे आहे. (Cooking Oil)

तज्ज्ञांच्या मते, एका निरोगी व्यक्तीने दिवसभरात साधारण 15 ते 20 मिली म्हणजेच 3 ते 4 चमचे तेलापेक्षा जास्त सेवन करू नये. या प्रमाणानुसार एका व्यक्तीसाठी महिन्याला साधारण 500 ते 600 मिली तेल पुरेसे ठरू शकते. चार जणांच्या कुटुंबासाठी महिन्याला सुमारे 2 लिटरपर्यंत तेल वापरणे योग्य प्रमाण मानले जाते. मात्र, अनेक कुटुंबांमध्ये यापेक्षा कितीतरी जास्त तेलाचा वापर केला जातो.
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; मंत्री नितेश राणे यांच्यासोबत विशेष बैठक मुंबई : वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांच्या ...

स्वयंपाकासाठी मोहरी, सूर्यफूल, सोयाबीन, नारळ आणि ऑलिव्ह तेल असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आहारात कोणते तेल वापरायचे हे ठरवताना त्यातील फॅटचे प्रमाण आणि आपल्या आरोग्याची स्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे. मोहरीचे तेल भारतीय स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. तर ऑलिव्ह तेलाचा वापर सॅलड किंवा कमी तापमानावरील पदार्थांसाठी करणे अधिक योग्य मानले जाते.

तेलाचा अतिवापर टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दररोज मोठ्या प्रमाणात तळलेले पदार्थ खाल्ल्यास शरीरात अतिरिक्त कॅलरी आणि चरबी जमा होऊ शकते. यामुळे वजन वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढणे आणि मधुमेहासह हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो.

हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी तेलाचे प्रमाण अधिक काळजीपूर्वक ठरवावे. अशा व्यक्तींनी आपल्या डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहाराचे नियोजन करणे योग्य ठरते.एकूणच, तेल पूर्णपणे बंद करण्यापेक्षा योग्य प्रकारचे तेल मर्यादित प्रमाणात वापरणे महत्त्वाचे आहे. घरात महिन्याला किती तेल वापरले जाते, याची नोंद ठेवल्यास त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.