मुंबई : भारतातील उद्योग जगतातील सर्वात मोठी उद्योग समूह असलेला टाटा सन्सबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. टाटा सन्सच्या १०० वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय. कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा AGM स्थगित करण्यात आली आहे.
टाटा सन्सची अॅन्युअल जनरल मीटिंग यानी AGM वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवारी पुढे ढकलण्यात आली आहे. एजीएम पुढे ढकलण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आवश्यक संख्येने सदस्य उपस्थित नसल्यामुळे एजीएम पुढे ढकलण्यात आली. विशेष म्हणजे, गेल्या १०० वर्षांत टाटा सन्सने एजीएम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
एजीएम दुपारी २:३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केली जाणार होती, पण कोरम नसल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. सूत्रांनुसार, सर रतन टाटा ट्रस्ट (SRTT) आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नामनिर्देशित केल्या जाणाऱ्या प्रतिनिधीसंदर्भात असलेल्या नियामक निर्बंधांमुळे ही अडचण निर्माण झाली.
कशामुळे कोरमवर परिणाम? : महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांनी जारी केलेल्या नियामक निर्बंधांमुळे, SRTT सध्या संयुक्त प्रतिनिधीची नियुक्ती करू शकत नाही. टाटा सन्सच्या नियमावलीनुसार, वैध गणपूर्तीसाठी संबंधित संयुक्त नामनिर्देशित प्रतिनिधीसह किमान पाच सदस्यांची उपस्थिती आवश्यक असते. त्यामुळे, प्रतिनिधीच्या अनुपस्थितीमुळे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या गणपूर्तीवर परिणाम झाला.
AGM ची स्थगिती दुर्मिळ घटना : महत्त्वाची गोष्ट म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द होणे ही एक दुर्मिळ घटना आहे, आणि कदाचित टाटा सन्सच्या १०० वर्षांहून अधिक काळाच्या कॉर्पोरेट इतिहासातील ही पहिलीच घटना असावी. भारतीय कंपनी कायद्यानुसार प्रत्येक आर्थिक वर्षानंतर एका विहित कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे, ती पूर्णपणे रद्द करण्याची कोणतीही तरतूद नाही. अपवादात्मक परिस्थितीत, एनसीएलटी (NCLT) सारख्या कायदेशीर न्यायाधिकरणाच्या आदेशाने ती केवळ पुढे ढकलली किंवा थांबवली जाऊ शकते.