Saturday, August 1, 2026

Raj Thackeray : सिद्धिविनायक मंदिरातून १८ कोटींची लूट, राज ठाकरेंचा आरोप; न्यासाच्या अध्यक्षांनी फेटाळला आरोप

Raj Thackeray : सिद्धिविनायक मंदिरातून १८ कोटींची लूट, राज ठाकरेंचा आरोप; न्यासाच्या अध्यक्षांनी फेटाळला आरोप

मुंबई : सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Temple) न्यासाच्या दानपेटीतून दरवर्षी तब्बल १८ कोटी रुपयांची लुटालूट होत असल्याचा गंभीर आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. न्यासाच्या विश्वस्तांनीच यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली असल्याचे सांगत, या प्रकरणाचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचल्याचा दावाही त्यांनी केला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २० व्या वर्धापनदिन मेळाव्यात ते बोलत होते. राज ठाकरेंचा आरोप श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी फेटाळला आहे.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, भाविक श्रद्धेने मंदिरात दान टाकतात, परंतु तिथेच कर्मचारी चोरी करताना पकडले गेले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्यापूर्वी दर बुधवारी दानपेटीची मोजदाद ५० लाखांच्या आत भरत होती. मात्र, कारवाईनंतर हीच रक्कम दीड कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याचा अर्थ उर्वरित रक्कम लंपास केली जात होती आणि वर्षाला सुमारे १८ कोटी रुपयांचे नुकसान न्यासाचे होत होते. राहुल लोंढे, मीना कांबळी, गोपाळ दळवी आणि सुदर्शन सांगळे या विश्वस्तांनी स्वतः उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी नमूद केले.

या वेळी राज ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवरही टीका केली. नीट परीक्षेतील गोंधळ, शिक्षणावरील घटता खर्च आणि बेरोजगारीमुळे तरुण-तरुणींमध्ये तीव्र संताप असल्याचे त्यांनी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना, त्यांना फिंगरप्रिंट आणि फूटप्रिंटमधील फरक कळत नसल्याची टीका त्यांनी केली. तसेच रस्ते, पाणी, शिक्षण व आरोग्य या मूलभूत सुविधांअभावी तरुण देश सोडून जात असून, सरकारने या वास्तविक प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सिद्धिविनायक मंदिरात आर्थिक गैरव्यवहार नाही

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासामध्ये कोणताही आर्थिक गैरव्यवहार किंवा घोटाळा झालेला नाही, असा खुलासा न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी केला आहे. काही विश्वस्तांनी सरकारला दिलेल्या पत्रामुळे नागरिकांमध्ये गैरसमज पसरला असून, मंदिर न्यासाचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि उत्कृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाविकांकडून दर्शनासाठी ऑनलाईन माध्यमातून पैसे घेणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >