नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणाच्या वादात शिक्षणमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान सोमवारी पहिल्यांदाच संसद भवनात पोहोचले. या वेळी सत्ताधारी भाजप आणि एनडीएच्या (NDA) खासदारांनी त्यांचे दणक्यात स्वागत केले. संसद भवनाच्या आवारात धर्मेंद्र प्रधान यांच्या गाडीतून उतरताच "धर्मेंद्र प्रधान झिंदाबाद" अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला.
गाडीतून उतरून प्रधान यांनी हसतमुखाने, हात जोडून सर्वांचे अभिवादन स्वीकारले. खासदार आणि समर्थकांच्या अलोट गर्दीत एका खासदाराने त्यांच्या डोक्यावर पारंपारिक टोपी आणि खांद्यावर शाल पांघरून त्यांचा सन्मान केला. या प्रसंगी बोलताना एका सत्ताधारी खासदाराने म्हटले की, "कोणताही थेट आरोप झालेला नसताना किंवा गैरव्यवहारात नाव नसताना स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देणारे प्रधान हे देशातील पहिलेच मंत्री असावेत." विरोधी पक्षांच्या वाढत्या दबावानंतर त्यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
'एसी रुम'मधील नेता नाही; काँग्रेसच्या वक्तव्यावर सडेतोड उत्तर
#WATCH | Delhi: Former Union Education Minister and BJP MP Dharmendra Pradhan arrives at the Parliament.
BJP-NDA MPs sloganeer "Dharmendra Pradhan zindabad" as they receive him here. pic.twitter.com/7DHXIzMkvI
— ANI (@ANI) July 27, 2026
संसद भवनात प्रवेश करताना काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी धर्मेंद्र प्रधान यांना पाहताच "असं घडत असतं!" असा उपरोधिक टोला लगावला. यावर जराही न डगमगता धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ पलटवार केला. "काहीही घडलेलं नाही! मी केवळ एसी रुममध्ये बसून राजकारण करणारा नेता नाही, तर रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे," अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर जोरदार प्रतिहल्ला चढवला.
राजीनाम्यामागे 'त्याग' आणि 'जबाबदारीचा' संदेश
राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर (ट्विटर) आपली भूमिका स्पष्ट केली. "गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. हा माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा किंवा अहंकाराचा विषय नाही. देशातील युवाशक्ती हीच भारताची खरी ताकद आहे. या तरुणांना कोणत्याही प्रकारच्या संभ्रमाच्या किंवा अविश्वासाच्या दुष्टचक्रात अडकू देणार नाही, हाच माझा निर्धार आहे," असे प्रधान यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
पुढे काय? संघटन की राज्याची धुरा?
शिक्षणमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्यावर आता पक्षाकडून कोणती नवी जबाबदारी दिली जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर भाजपच्या निवडणूक प्रचाराची मोठी धुरा सोपवली जाऊ शकते किंवा पक्ष संघटनेत महत्त्वाचे पद दिले जाऊ शकते. समर्थकांच्या मते, राष्ट्रीय हितासाठी त्यांनी दिलेला हा त्याग त्यांची राजकीय प्रतिमा उंचावणारा ठरेल.
भाजपचे संकटमोचक आणि संघटक
धर्मेंद्र प्रधान यांची भाजपमधील गणना केवळ ओडिशातील बड्या नेत्यांमध्येच नाही, तर राष्ट्रीय स्तरावरील एका कुशल रणनीतिकार आणि संकटमोचक म्हणून केली जाते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा होता. याशिवाय उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि कर्नाटकातील निवडणुकांमध्ये त्यांनी प्रभारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा भक्कम पाठिंबा
भाजपा के कार्यकर्ताओं के लिए पद से कहीं अधिक महत्वपूर्ण देश, हमारी युवा पीढ़ी और विद्यार्थी हैं। आज केंद्रीय शिक्षा मंत्री श्री @dpradhanbjp जी का अपने पद से इस्तीफा इसी को दर्शाता है।
मोदी सरकार देश के युवाओं की भावनाओं का सम्मान करती है और पेपर लीक के विरुद्ध आवश्यक सुधारों के… https://t.co/p12wLKGUkm
— Amit Shah (@AmitShah) July 25, 2026
प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या सुधारणांचे कौतुक केले आहे. भाजपच्या मते, हा राजीनामा म्हणजे त्यांच्या राजकीय वर्चस्वाला लागलेला धक्का नसून 'राजकीय उत्तरदायित्व', 'त्याग' आणि 'राष्ट्रहिताचा' एक उत्तम आदर्श आहे.
Taking into account the views and sentiments of our youth and students, Union Education Minister Shri Dharmendra Pradhan has resigned from his post. This resignation is a testimony of the fact that for Prime Minister Shri @narendramodi and our government, safeguarding the future…
— Rajnath Singh (@rajnathsingh) July 25, 2026
ओडिशाच्या राजकारणावर काय परिणाम होणार ?
धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय मंत्रिमंडळात ओडिसाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होते. २०१४ पासून ओडिशात भाजपचा जनाधार वाढवण्यात आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला ऐतिहासिक यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. राज्यातील भाजपच्या ७८ आमदारांपैकी बहुतांश आमदार आणि राज्य मंत्रिमंडळातील सुमारे ४० टक्के मंत्री हे प्रधान यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे शिक्षणमंत्रिपद सोडले तरी ओडिशाच्या राजकारणातील आणि पक्षातील त्यांचे वर्चस्व अबाधित राहील, असा विश्वास राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.