५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई; सभा, संमेलने, मिरवणुका काढण्यास बंदी
मुंबई : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने २३ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण मुंबई (Mumbai) शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. विविध गोपनीय स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता तसेच मानवी जीवन व मालमत्तेच्या हानीची भीती असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार, २३ जुलै रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते ६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण मुंबईत ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या बेकायदेशीर एकत्र येण्यावर आणि हालचालींवर कायदेशीर बंदी असेल.
नवी दिल्ली : दिल्लीतील कनॉट प्लेस (Connaught Place) आणि जंतर-मंतर परिसरात झालेल्या CJP आंदोलनादरम्यान (Protest) इंटरनेट (Internet) आणि मोबाईल नेटवर्क (Mobile Network) बंद असतानाही ...
मुंबई पोलीस (Mumbai Police) कायद्यातील विशेष तरतुदींचा वापर करून पोलीस उपआयुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी हे आदेश जारी केले आहेत. या कालावधीत शहरात कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर सभा, संमेलन किंवा मिरवणुका काढण्यास संपूर्ण मनाई असेल. तसेच अशा कार्यक्रमांमध्ये लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड पथके आणि फटाक्यांच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने या नियमांमधून काही महत्त्वाच्या बाबींना वगळले आहे. लग्नसोहळे, कौटुंबिक समारंभ, अंत्ययात्रा आणि अंत्यसंस्काराच्या सभांना या जमावबंदीतून विशेष सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कंपन्या, सहकारी संस्था आणि विविध संघटनांच्या दैनंदिन कायदेशीर बैठका किंवा सामाजिक मेळावे नेहमीप्रमाणे घेता येतील.
शहरातील सांस्कृतिक व व्यावसायिक व्यवहार सुरळीत राहावेत यादृष्टीने चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच करमणुकीच्या ठिकाणी कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांना एकत्र येण्याची मुभा असेल. शासकीय व निमशासकीय कार्यालये, न्यायालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाला यातून वगळण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शाळा व महाविद्यालयांमधील नियमित सत्रे आणि कारखाने, दुकाने व व्यापारी आस्थापनांमधील दैनंदिन व्यावसायिक गर्दीवर ही बंदी लागू होणार नाही. याशिवाय, स्थानिक पोलीस उपआयुक्त किंवा सक्षम अधिकाऱ्यांची विशेष परवानगी असलेल्या सभा व मिरवणुकांनाही यातून सवलत दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.