मुंबई : मुंबई (Mumbai) शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून बुधवारी (२३ जुलै) पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी केला असून वादळी पाऊस (Thunderstorm) आणि ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे (Strong Winds) वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
शनिवारपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांत अधूनमधून मुसळधार सरी कोसळत आहेत. सध्या मुंबई शहरात सुमारे ३८ किलोमीटर प्रतितास, तर सांताक्रूझ (Santacruz) परिसरात ४३ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. हवामान अभ्यासकांच्या मते, बुधवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी लिहिलेलं पत्र जसंच्या तसं... राजकारणात सत्तेची खुर्ची ...
हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारपर्यंत मुंबईत वादळी पावसाचा प्रभाव कायम राहू शकतो. सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० या २४ तासांत सांताक्रूझ येथे ४४.७ मिमी, तर कुलाबा (Colaba) येथे ३४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून पूर्व उपनगरांमध्ये (Eastern Suburbs) सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या भागात जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाला आहे.
दरम्यान, मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे समुद्र (Sea) खवळला असून मंगळवारी मोठ्या लाटा उसळल्या. बुधवारी सकाळी ११:४४ वाजण्याच्या सुमारास समुद्रात २.५३ मीटर उंचीच्या भरतीच्या (High Tide) लाटा उसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अधूनमधून पाऊस पडत असल्यामुळे शहरातील जनजीवन (Public Life) पूर्णपणे विस्कळीत झालेले नसले, तरी नागरिकांनी हवामान विभागाच्या इशाऱ्याचा विचार करून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसाठी जारी करण्यात आलेला 'यलो अलर्ट' (Yellow Alert) गुरुवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.