सामान्य माणूस असता तर एव्हाना कायद्याचा बडगा उगारला असता
मुंबई : उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर त्यांच्या सुनेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनीही या प्रकरणात नाराजी व्यक्त करीत राऊत यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. "विनायक राऊत यांच्या जागी जर कोणी सर्वसामान्य व्यक्ती असती, तर आतापर्यंत त्याला तात्काळ अटक करून कायद्याचा बडगा उगारला असता. मात्र, राजकीय नेत्यांच्या बाबतीत तसे घडताना दिसत नाही," अशा शब्दांत दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली.
माध्यमांशी संवाद साधताना अंजली दमानिया म्हणाल्या, "माझ्या मनात कोणाच्याही कौटुंबिक जीवनात पडण्याची काडीमात्र इच्छा नाही. परंतु, एका माजी खासदारावर आणि त्यांच्या कुटुंबावर कौटुंबिक छळाचे कलम ८५ तसेच नरबळी व अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्याचे कलम ३(२) आणि ३(३) लागणे हे अत्यंत धक्कादायक आहे. सार्वजनिक पदावर राहिलेल्या व्यक्तीच्या कुटुंबावर जेव्हा इतके गंभीर आरोप होतात, तेव्हा त्याची चौकशी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनेच व्हायला हवी", अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ठाणे : कच्छी अस्मिता मंचतर्फे आयोजित 'कच्छी पगडी कोणशिरे' या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी समाजाशी असलेले आपले जिव्हाळ्याचे आणि ...
विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत (Girija Raut) यांनी पती गीतेश राऊत, सासरे विनायक राऊत यांच्यासह कुटुंबातील एकूण ७ जणांविरुद्ध कौटुंबिक छळ आणि अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. २०१७ मध्ये विवाह झाल्यानंतर ऊटी येथे हनीमूनला गेले असता पती गीतेश याने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला व शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यास टाळाटाळ केली, असा आरोप गिरिजा यांनी तक्रारीत केला आहे. याशिवाय २०१८ मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पतीने शिवीगाळ करत जबर मारहाण केली आणि 'मला हात लावशील तर विधवा होशील' अशी धमकी दिल्याचा तपशीलही त्यांनी पोलिसांत दिला आहे. पती शारीरिक संबंध ठेवण्यास असक्षम असल्याने सासरच्या मंडळींनी जादूटोणा आणि अघोरी उपायांचा अवलंब केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, या गुन्ह्यात पोलिसांनी अघोरी कृत्य करणाऱ्या फिरोज शेख या भोंदूबाबाला आधीच अटक केली आहे.
दरम्यान, सुनेच्या छळ प्रकरणात न्यायालयाने विनायक राऊत यांना तात्काळ अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला असून, त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता २३ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.