मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे झालेल्या राजकीय भूकंपाची तीव्रता कमी होत असतानाच, आता राज्यात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे या दोघांमध्ये मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या दोन बड्या नेत्यांच्या भेटीमुळे शरद पवार गट सत्तेत सामील होणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात झालेल्या या बैठकीत शरद पवार यांचा पक्ष जर महायुती आणि केंद्र स्तरावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी झाला, तर पक्षाच्या वाट्याला सत्तेत काय वाटा येऊ शकतो, यावर सविस्तर खल झाल्याचे समजते. या दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर जयंत पाटील यांनी लागलीच राष्ट्रवादीच्या आणखी एका अत्यंत वरिष्ठ नेत्याची भेट घेऊन चर्चा केली. शरद पवार यांच्या पक्षात सध्या सत्तेत सहभागी होण्याबाबत दोन मतप्रवाह असल्याचे बोलले जात आहे. यातील एका गटाला सत्ताधारी बाकांवर बसण्याची इच्छा आहे, तर दुसरा गट विरोधी पक्षातच राहण्यावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांनी आपल्या पक्षातील एका ज्येष्ठ नेत्यावर विधानसभेतील १० आमदार आणि लोकसभेतील ८ खासदारांशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घेण्याची, तसेच भाजपच्या वरिष्ठ पातळीवर बोलणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याची चर्चा आहे.
या संपूर्ण प्रकरणावर जयंत पाटील यांना विचारले असता, त्यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी मुंबईत भेट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, ही बैठक केवळ अनौपचारिक चर्चेसाठी होती, असे सांगत त्यांनी यातील राजकीय तपशील जाहीर करण्याचे टाळले. शरद पवार यांचे राजकारण हे नेहमीच 'धक्कातंत्रा'साठी ओळखले जाते. पवारांची नेमकी राजकीय भूमिका काय असेल, याचा ठोस अंदाज वर्तवणे भल्याभल्यांना जमत नाही, त्यामुळे या भेटीकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे.
नागपूर : राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासन हायअलर्टवर असून, पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहचवली जाईल. कोणत्याही ...
१० आमदार आणि ८ खासदारांचे बळ
या राजकीय भूकंपामागे काही महिन्यांपूर्वीच्या घडामोडींचेही संदर्भ जोडले जात आहेत. जानेवारी महिन्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येऊन सत्तेत सहभागी होणार, असे पडद्यामागे ठरले असल्याच्या चर्चा तेव्हा रंगल्या होत्या. मात्र, त्यांच्या अपघाती निधनामुळे दोन्ही पवारांचे पक्ष एकत्र आल्यास ते 'एनडीए'सोबत जाणार की 'इंडिया' आघाडीसोबत राहणार, हा प्रश्न अनुत्तरित राहिला होता. आता या भेटीमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, रोहित पाटील, संदीप क्षीरसागर यांच्यासह विधानसभेतील १० आमदार आणि सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, निलेश लंके यांच्यासह लोकसभेतील ८ खासदार अशा एकूण बळासह शरद पवार काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.