मुंबई : जे ढग गरजत असतात ते बरसत नाही. शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधी आपल्या स्वतःच्या पक्षाकडे लक्ष देऊन तो सांभाळण्याचे काम केले पाहिजे. त्यांनी राम मंदिराच्या विषयात विनाकारण हस्तक्षेप करू नये," अशा स्पष्ट शब्दांत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अयोध्येत श्रीराम जन्मस्थानावर भव्य राम मंदिर उभे करण्यात आले असून, त्यासंदर्भात आलेल्या तक्रारींची चौकशी सरकारकडून अत्यंत पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचे भातखळकर यांनी स्पष्ट केले.
दान पेटी प्रकरणाची चौकशी 'एसआयटी'मार्फत
राम मंदिर दान पेटीतील कथित गैरव्यवहार प्रकरणावर स्पष्टीकरण देताना भातखळकर म्हणाले की, उत्तर प्रदेश सरकारने केवळ संशयावरून आणि आलेल्या एका आरोपामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) नेमले आहे. विशेष म्हणजे, श्रीराम मंदिर ट्रस्टने स्वतः पुढाकार घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने सुरू असून प्रशासनाला यामध्ये काहीही लपवायचे नाही. चौकशीअंती जो कोणी दोषी आढळेल, त्याला कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, कोरोना काळात स्वतःचे सरकार असताना जे घरातून कारभार पाहत होते, त्यांनी राम मंदिरावर न बोललेलेच बरे, असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला. दरम्यान, सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाचा संदर्भ देत, "पुढे काय होते ते पहा," असे एक सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.
नवी दिल्ली : पवित्र अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशभरातील भाविकांना उद्देशून विशेष पत्र ...
मुंबईतील दुर्घटनांमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
मुंबईत मुसळधार पावसामुळे झालेल्या दोन नागरिकांच्या मृत्यूवर आमदार भातखळकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. हे मृत्यू अत्यंत दुर्दैवी असून प्रशासनाने आधीच मार्गदर्शक सूचना दिल्या असतानाही ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला, त्यांच्यावर प्राथमिक कारवाई करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. पालिकेचा कुठलाही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे सांगतानाच, निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांचा जीव गेल्याने दोषी अधिकाऱ्यांवर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आपण सभागृहात लावून धरल्याचे भातखळकर यांनी सांगितले.
महापौर रितू तावडे यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा
दुसरीकडे, मुंबईतील दुर्घटनांवरून महापौर रितू तावडे यांनी पालिकेच्या संबंधित वॉर्ड अधिकारी आणि अभियंत्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "ही वॉर्ड अधिकारी आणि संबंधित अभियंत्यांची अत्यंत गंभीर चूक आहे. ऐन पावसाळ्यात अशी कामे हाती घेण्याची काहीच गरज नव्हती," असे स्पष्ट करत तावडे यांनी अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला. जर अधिकारी अशाच प्रकारे कर्तव्यात निष्काळजीपणा करत राहिले, तर चेंबूरच्या घटनेप्रमाणेच त्यांच्यावरही थेट कठोर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा सज्जड दम महापौरांनी दिला आहे.