Thursday, July 2, 2026

Marathwada Earthquake : 'मध्यरात्री धरणी हादरली!' औंढा नागनाथात ३.६ रिश्टरचा भूकंप; भीषण गडगडाटाने नागरिकांची झोप उडाली

Marathwada  Earthquake : 'मध्यरात्री धरणी हादरली!' औंढा नागनाथात ३.६ रिश्टरचा भूकंप; भीषण गडगडाटाने नागरिकांची झोप उडाली

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यासह परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्री १ वाजून २० मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (NCS) ३.६ रिश्टर स्केल इतकी तीव्रता नोंदवली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा आणि जलालदाभा परिसरात जमिनीखाली अवघ्या ५ किलोमीटर खोलीवर असल्याने धक्क्यांची तीव्रता अधिक जाणवली. (Marathwada Earthquake)

भूकंपापूर्वी भूगर्भातून झालेल्या प्रचंड गडगडाटाने नागरिक दचकले. काही क्षणांतच जमिनीला हादरे बसू लागल्याने अनेकांनी जीवाच्या भीतीने लहान मुलांसह घराबाहेर धाव घेत उघड्या मैदानात आश्रय घेतला. अनेक गावांमध्ये नागरिकांनी रात्रभर जागून काढल्याचे सांगितले जात आहे.

घरांच्या काचा थरथरल्या, भांडी-कपाटे हलली :

रात्रीच्या शांततेत अचानक झालेल्या गडगडाटानंतर काही सेकंद जमीन हादरली. अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा थरथरल्या, तर घरातील भांडी आणि कपाटातील वस्तू हलल्याने नागरिकांमध्ये एकच घबराट उडाली. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मात्र, सततच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट कायम आहे. (Marathwada Earthquake)

अनेक गावांना जाणवले तीव्र धक्के :

भूकंपाचा केंद्रबिंदू फुलदाभा-जलालदाभा परिसरात असला तरी त्याचे धक्के औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा, जलालदाभा, पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, निशाणा, असोंदा, काकडदाभा, पांगरा, मेथा, जडगाव, राजापूर आणि जांब या गावांसह वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, कुपटी, वापटी, कुरुंदा आणि गिरगाव येथेही जाणवले. (Marathwada Earthquake)

वारंवार धक्के, पण कारणाचा शोध अद्याप नाही :

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आणि कळमनुरी तालुक्यातील रामेश्वरतांडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सौम्य ते मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसत आहेत. भूगर्भातून येणारे गूढ आवाज आणि वारंवार होणाऱ्या कंपनांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. (Marathwada Earthquake)

प्रशासनावर नागरिकांचा संताप :

स्थानिक नागरिकांच्या मते, प्रत्येक भूकंपानंतर महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी गावांना भेट देऊन पाहणी करतात आणि खबरदारीच्या सूचना देतात. मात्र, या वारंवार होणाऱ्या भूकंपामागील नेमके शास्त्रीय कारण काय? धक्क्यांची तीव्रता वाढत का आहे? याचा ठोस अभ्यास आणि कायमस्वरूपी उपाययोजना अद्याप झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने केवळ पंचनामे आणि पाहणीपुरते मर्यादित न राहता भूकंपाच्या मूळ कारणांचा सखोल वैज्ञानिक अभ्यास करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे. (Marathwada Earthquake)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >