Sachin Ahir : कामगार ते उपसभापती'... संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत सचिन अहिरांनी दिली निष्पक्ष कामकाजाची ग्वाही

उपसभापती पदाची गरिमा राखत प्रत्येक सदस्याला समान न्याय देणार - सचिन अहिर


मुंबई : राजकीय व्यासपीठावर राजकारण जरूर होईल, मात्र उपसभापतीच्या या सर्वोच्च खुर्चीवर बसल्यानंतर पक्षभेद विसरून प्रत्येक सदस्याला समान न्याय देणे हीच माझी प्राथमिक जबाबदारी असेल," अशी ग्वाही नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांनी आज दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर सभागृहातील सर्वपक्षीय सदस्यांचे आभार मानताना त्यांनी या पदाची गरिमा आणि लोकशाहीची उच्च परंपरा राखण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. बदलत्या राजकीय समीकरणांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, पद कोणतेही मिळाले तरी सचिन अहिर हा कार्यकर्ता सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली आपली बांधिलकी कधीही तुटू देणार नाही.


आपल्या कृतज्ञता भाषणाची सुरुवात करताना सचिन अहिर यांनी कवी नारायण सुर्वे यांच्या "एकटाच आलो नाही, युगाची साथ आहे.. हो, मी कामगार आहे आणि मी तळपती तलवार आहे" या अजरामर ओळी सादर करत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी त्यांनी सातरस्ता आणि धोबीघाट परिसरातील आपले बालपण, गिरणी कामगार चळवळीतील सहभाग आणि खटाव मिलमध्ये एका वेल्डरचा हेल्पर म्हणून केलेली नोकरी, असा आपला अत्यंत संघर्षमय आणि भावनिक प्रवास सभागृहासमोर मांडला. परदेशात नशीब आजमावण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर पुन्हा कामगारांच्या लढ्यात स्वतःला झोकून दिले. कामगारांच्या हक्कासाठी दिल्लीतील 'बीआयएफआर'समोर (BIFR) यशस्वी लढा दिल्यानंतर हजारो कामगारांनी केलेले स्वागत हाच आपल्या आयुष्याचा 'टर्निंग पॉइंट' ठरल्याची आठवण त्यांनी अत्यंत भावुक होत सांगितली.


आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाबाबत बोलताना सचिन अहिर यांनी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील दिग्गज नेत्यांचे आभार मानले. यात आदरणीय शरद पवार, दिवंगत विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील, तसेच नारायण राणे, जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस या सर्वपक्षीय नेत्यांसोबत काम करण्याची मिळालेली संधी हा समृद्ध करणारा अनुभव होता, असे ते म्हणाले. राजकीय विचारभिन्नता असली तरी सर्वच पक्षांतील नेत्यांशी जिव्हाळ्याचे आणि मित्रत्वाचे संबंध राखणे, हेच आपल्या राजकारणाचे खरे बळ असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गृहनिर्माण, सामाजिक न्याय, उद्योग आणि कामगार मंत्रालयाची जबाबदारी सांभाळताना घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.


शेवटी, उपसभापती म्हणून आपल्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट करताना सचिन अहिर यांनी लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचे आश्वासन दिले. संसदीय कामकाजाचे पवित्र्य राखताना सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या सदस्यांना आपले प्रश्न मांडण्याची समान संधी दिली जाईल. सभागृहाची प्रतिष्ठा सर्वोच्च ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधीमंडळाच्या माध्यमातून सुटण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, असा शब्द त्यांनी संपूर्ण सभागृहाला दिला.

Comments
Add Comment

Saranjam land : कोल्हापुरातील ११ हजार ३९४ हेक्टर सरंजाम जमिनी अखेर 'फ्री-होल्ड'

- चंदगड तालुक्यातील ६० हजार लोकसंख्येचा ५५ वर्षांचा प्रलंबित प्रश्न सुटला; नजराण्याची ५४ लाखांची रक्कमही

Snake Venom Bank : राज्यात 'सर्पविष बँक' स्थापन होणार - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- सर्पदंशाला 'नोटिफाईड डिसिज' घोषित करण्याबाबत सकारात्मक मुंबई : राज्यात सर्पदंश आणि त्यामुळे होणाऱ्या

Maharashtra Weather : महाराष्ट्रात ६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यावर रेड-ऑरेंज अलर्ट

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार ३० जून ते ६ जुलैदरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची

IVF center : विनापरवानगी 'आयव्हीएफ सेंटर' चालवणाऱ्यांवर मकोका लावणार

- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर; पुढील अधिवेशनात कायद्यात सुधारणा करण्याची ग्वाही मुंबई : राज्यात वाढत असलेली

Jalgaon : जळगाव स्थानकावर मोठा अनर्थ टळला! धावत्या अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीला आग

Jalgaon Railway Station : जळगाव रेल्वे स्थानकावर बुधवारी सकाळी एक मोठा अनर्थ थोडक्यात टळला. मुंबईहून अमृतसरकडे धावणाऱ्या

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या