Ashok Kharat Case : 105 साक्षीदार, सत्र न्यायालयात खटल्याला सुरुवात; ॲड. उज्ज्वल निकम सरकार पक्षाची बाजू मांडणार

Ashok Kharat Case : दैवी शक्ती असल्याचा बनाव करत मंत्र-तंत्राच्या नावाखाली महिलांवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) ऊर्फ कॅप्टन याच्याविरोधातील खटल्याला आता वेग आला आहे. या प्रकरणातील पहिल्याच गुन्ह्यात पोलिसांनी तब्बल १०५ साक्षीदारांचे जबाब नोंदवत भक्कम पुरावे गोळा केले आहेत. या गंभीर प्रकरणाचा प्रभावीपणे पाठपुरावा करण्यासाठी राज्य शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली असून, दोन गुन्ह्यांतील दोषारोपपत्र नाशिक सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.



मंगळवारी (३० जून) या खटल्याची पहिली सुनावणी सत्र न्यायालयात झाली. सुरक्षेच्या कारणास्तव संशयित अशोक खरात याला कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video conferencing) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जुलै रोजी ठेवली आहे. यापूर्वी विशेष तपास पथकाने या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र नाशिक जिल्हा न्यायालयात (Nashik District Court) दाखल केले होते. मात्र, गुन्ह्यांचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याने हे खटले सत्र न्यायालयात चालवण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार दोषारोपपत्रे सत्र न्यायालयात वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.



ॲड. उज्ज्वल निकम सरकार पक्षाची बाजू मांडणार


२२ जून रोजी दोन गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ३० जून रोजी आणखी दोन गुन्ह्यांतील दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत खरातविरुद्ध दाखल असलेल्या चार गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल झाले असून, या खटल्यांच्या सुनावणीला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सरकार पक्षाची बाजू विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम मांडणार असून, त्यांना सहायक विशेष सरकारी वकील म्हणून अहिल्यानगरचे ॲड. परिमल फळे सहकार्य करणार आहेत. खरातविरुद्धचा पहिला गुन्हा १७ एप्रिल रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी १०५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, तपासात अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत.



२४ अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक


महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर २० मार्च २०२६ पासून या संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला. या पथकात पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, उपअधीक्षक अमोल भारती, किरणकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्यासह एकूण २४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाने सखोल तपास करून विविध गुन्ह्यांतील दोषारोपपत्रे तयार केली असून, आता त्यावर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.



खरातविरुद्ध १८ गुन्ह्यांची नोंद


अशोक खरात हा १८ मार्चपासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याविरोधात आतापर्यंत एकूण १८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी ८ गुन्हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहेत. तर उर्वरित १० गुन्हे आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत नोंदवण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये तपास यंत्रणेकडून मोठ्या प्रमाणावर पुरावे संकलित करण्यात आले असून, सत्र न्यायालयातील सुनावणीमुळे आता या बहुचर्चित प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Ankit Baliyan Murder : शामलीत अंकित बलियान हत्या प्रकरणातील दोन संशयित चकमकीत ठार; पोलीस कर्मचारीही जखमी

शामली :  उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बलियान यांच्या हत्या प्रकरणातील दोन

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार