हो, मी सावित्री !

वटसावित्रीबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर उष्णतेमुळे सत्यवानाला भोवळ आली. सावित्रीने त्याला वडाच्या झाडाखाली नेले. वडाच्या झाडाखाली प्राणवायू मुबलक प्रमाणात असल्यामुळे सत्यवान वाचला. त्या वटवृक्षाच्या सान्निध्यात पतीचे प्राण वाचले म्हणून तिने कृतज्ञतापूर्वक वडाची पूजा केली. ही घडलेली घटना. त्याचे पौराणिक महत्त्व सांगितले जाते तो वेगळा विषय. अशा कथा विपुल प्रमाणात आहेत पुराणात.
धार्मिक तत्त्व व वैज्ञानिक सिद्धांत यात फरक हाच असतो की धार्मिक तत्त्वात एक चिरंतन आणि निर्विवाद निश्चित अशा सत्याचा समावेश असल्याचा दावा केला जातो. याउलट विज्ञान हे नेहमीच तात्पुरत्या
स्वरूपाचे ठरते.



आपल्या कुठल्याही संतांनी अशा प्रकारच्या पूजेला मान्यता दिली नव्हती. संतांची भक्ती आणि शिकवण वेगळ्या प्रकारची होती. माणसाने आपले कर्तव्यकर्म करावे व ते ईश्वराची आज्ञा म्हणून ईश्वरार्पणबुद्धीने करावे. पण कर्मकांडाच्या साम्राज्यात आपण संतांची भक्ती आणि श्रद्धा एका मर्यादित क्षेत्रात बंदिस्त करून ठेवली.



आजवरच्या इतिहासात कुठल्या महापुरुषाच्या पत्नीने वटसावित्री पूजा केल्याचे पुरावे आढळतात? श्री छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, पेशवे, संत तुकाराम, महात्मा गांधी, महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, आगरकर, बाबासाहेब आंबेडकर ही सगळी मंडळी ईश्वरावर श्रद्धा असणारी होती पण ना कधी यांनी सत्यनारायणाची पूजा केली ना यांच्या पत्नी कधी वटसावित्री व्रत करत होत्या. त्या काळातही या बायकांना स्वतःच्या पतीच्या कर्तृत्वावर विश्वास होता. स्वकर्मावर विश्वास होता. त्यांना धर्माच्या कुबड्या घेण्याची आवश्यकता वाटत नव्हती.




वडाभोवती दोरे गुंडाळणाऱ्या स्त्रियांना जाऊन विचारा की,
"तुम्ही हे का करता? "
उत्तर मिळेल की,
"आमच्यात करावं लागतं. परंपरा आहे. पतीच्या संरक्षणासाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी, सात जन्म हाच पती मिळावा म्हणून किंवा व्रतामध्ये धर्माचरण असते" वगैरे सांगून अगदी सुशिक्षित महिलादेखील अशा व्रतांच्या आचरणाबाबत आग्रही असतात. पण मूळ कारण मात्र माहीतच नसते. सात जन्म म्हणजे काय? शात्रानुसार मानवाच्या जुन्या पेशी मृत होऊन नवीन पेशी निर्माण होतात तो पुन्हा जन्मच असतो. पूर्वी बालवयात लग्न होत असे. मुलींना एकत्र घरात राहावे लागे. त्यांना विरंगुळा म्हणून, बाहेर मोकळे वातावरण मिळावे, त्यानिमित्ताने छान कपडे घालायला, नटायला मिळत असे, त्याचबरोबर पतीविषयी प्रेम, जिव्हाळा निर्माण व्हावा, वडाच्या झाडाखाली प्राणवायू मिळावा, त्याचप्रमाणे वडाची पाने स्त्राव आणि रक्तस्त्राव थांबवण्याचे कार्य करतात म्हणून मासिकपाळीत हे व्रत करू देत नसत, पण इतर स्त्रियांना त्याचा विशेष लाभ मिळावा हाच उद्देश होता. पण आता स्थिती अशी आहे, की प्रत्येक व्यक्तीच्या मनात मृत्यूची अनामिक भीती असते. या अदृष्टाची भीती मनात इतकी घर करून असते की आपण कुठलेही मूळ कारण जाणून न घेता या गोष्टी मुकाटपणे स्वीकारतो. अतृप्त कामनांची पूर्ती, अपराधी भावनांची पूर्ती कुठल्याही कर्माद्वारे न करता या व्रतांद्वारे होते ही एक भावना हा व्यापक समाज मानवी मनाच्या मानसपटलावर सतत अंकित करत आलाय. अपराधी भावना म्हणजे इतर बायका जातात मग मी नाही गेले तर? माझ्या कुलपरंपरेत सगळ्या करतात मी जर नाही केले तर ते पाप ठरेल. माझ्या पतीवर काही संकट आले तर? ही भावना कार्य करवते.




एक अतिशय व्यावहारिक विचार म्हणजे जो तुमचा अधीरक्षक आहे. अन्नदाता आहे त्याच्या उदंड आयुष्याची कामना करणे स्वाभाविक आहे. तोच नसला तर कुटुंबाचे काय? माझं काय होईल? प्रत्येकवेळी प्रेम हे एकच कारण असते कशावरून? स्वार्थाचे तार जिथे जोडलेले असतात तिथे पाखंड जास्त असत. हे विधान म्हणजे हवाई किल्ला नाही. प्रत्यक्ष बायकांच्या तोंडून ऐकलंय जिथे प्रेम असते तिथे आडंबराची गरज नसते. वेदांतात तर 'व्रत करू नका अव्रती व्हा' सांगितले आहे कारण व्रताचा अर्थच होतो इच्छांची पूर्ती. सावित्रीने सत्यवानाला मृत्यूच्या दाढेतून आणले ते व्रत करून नव्हे तर निव्वळ प्रेमापोटी. तिने त्याला वाचवण्यासाठी स्वकर्मावर विश्वास ठेवला. तिच्या स्वभावात प्रभावाचा अभाव नव्हता. नंतर कधी वाचण्यात आलेय का की सावित्रीने गाव गोळा करून व्रत ठेवले की पूजा केली.
हे सगळे लिहिण्यामागे कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा हेतू नाही.भारतीय संस्कृतीला नावे ठेवण्याचा उद्देश नाही. प्रत्येक व्रत, परंपरा, सण, उपवास आपल्याकडे एका सिद्धांतावर आधारित आहेत. दुर्दैवाने त्याचा मूळ उद्देश बाजूला सारून धर्माला विस्कळीत करून समोर मांडले जाते त्याचे वाईट वाटते.



पूर्वजांनी जी काही कर्मकांड निश्चित केली त्यामागे उत्तम काहीतरी व्हावे हा हेतू होता. त्यावेळची मानवचेतना इतकेच विचार करू शकत होती की अमुक अमुक पूजा, व्रत, उपवास, श्राद्धसारखे विधी केल्याने कल्याण होईल आणि न केल्याने पाप. ही मनोभावना पूर्वजांनी ओळखली होती. कुठल्याही प्रथेमागे उद्देश भले होणे हाच होता. नंतर धर्माच्या सुशिक्षित ठेकेदारांनी त्याला वेगळे स्वरूप दिले. त्यामुळे प्रथा काय आहे हे बघण्यापेक्षा त्यामागे निर्धारित कामना काय आहे हे बघणे योग्य ठरेल. वटसावित्री व्रतामागे कामना जर पतीच्या उदंड आयुष्याची आहे, तर लक्ष त्यावर केंद्रित हवे. प्रथेचे औचित्य बघून कार्य होणे गरजेचे आहे. वडाला दोऱ्या बांधून ते साध्य होणार आहे का? उपवास करून साध्य होणार आहे का? बरं दिवसभर व्रत करून रात्री वाद घालायचा याला काही अर्थ उरतो का? तर नाही. आपण अर्धवट ज्ञानाच्या आधारावर अशा प्रथा पाळून उलटपक्षी आपल्या संस्कृतीची गरिमा नष्ट करत आहोत. काळा, निळा, जांभळा रंग त्यादिवशी अशुभ असतो, पूजा याचवेळी व्हावी नाहीतर अशुभ, कोण ठरवतो हे? सावित्री सांगून गेलीय का कुठे? पतीच्या उज्ज्वल भविष्यात रंग आणि वेळ कुठे आडवी आली? प्रश्न अनेक उत्तर मात्र निरुत्तर! हो मी सावित्री! हे किती स्त्रिया सांगू शकतील? जर खरंच मनाने, शरीराने सावित्री असाल (सुज्ञास सांगणे न लगे) तर खुशाल हे व्रत करा. अन्यथा ढोंग, पाखंड करू नका. त्याला 'धर्म', 'संस्कृती' नाव देऊन अपमानित करू नका. हे सगळे करण्यापेक्षा वटवृक्ष मानवाला जे काही मुक्तपणे देतोय त्याच्याविषयी वर्षातून एकदाच नाही तर रोज कृतज्ञता व्यक्त करा. संगोपन करा. वटसावित्रीच्या दिवशी किमान एक वटवृक्ष लावा.



हो मी सावित्री आहे कारण मी माझ्या पतीच्या सुखदुःखात त्याच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे.
हो मी सावित्री आहे कारण मला माझ्या कर्मावर विश्वास आहे.
हो मी सावित्री आहे कारण मला माझ्या भूमातेवर हरितक्रांती आणायची आहे. हो मी सावित्री आहे कारण मला माझ्या मूल्यांचा अभिमान आहे.
या सगळ्या गोष्टी पाळल्या गेल्या तर संस्कृती बहरेलच पण त्या बिचाऱ्या सावित्रीच्या आत्म्यास खरी शांती मिळेल.

Comments
Add Comment

Atacama Desert : लाखो रुपयांचे नवेकोरे कपडे थेट वाळवंटात फेकले जातात; कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Atacama Desert : जगभरात एका बाजूला फॅशनचा ट्रेंड दिवसेंदिवस बदलत आहे, तर दुसऱ्या बाजूला करोडो लोकांना अंग झाकण्यासाठी

स्वच्छंदी पक्ष्यांच्या आठवणी

आमच्या जायच्या-यायच्या रस्त्यावर ‘लव्हबर्ड्स’ विक्रीचे एक नवे दुकान सुरू झाले, तेव्हा माझी मुलगी साधारणपणे

'वूमेन पावर इम्पॅक्ट क्रिएटर ऑफ द इयर'

मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एमईटी)च्या वरिष्ठ व्यवस्थापन प्रतिनिधी श्रीमती विशाखा भुजबळ यांना शिक्षण, महिला

अगतिकता (?)

सिर्फ एक बंदा काफी है’ हा एक अतिशय महत्त्वाचा आणि बोलका चित्रपट ओटीटीवर आहे. प्रत्येकाने तो जरूर पहावा.

Social Media : जर ३० दिवस सोशल मीडिया बंद केलं तर काय होईल?

जाणून घ्या शरीर आणि मनावर होणारे ८ सकारात्मक बदल आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया (Social Media) हा अनेकांच्या दैनंदिन

'Strawberry Moon' : आज दिसणार वर्षातील सर्वात देखणा 'स्ट्रॉबेरी मून'; संध्याकाळी चुकवू नका हे आकाशातील अद्भुत दृश्य

'Strawberry Moon' : आजची संध्याकाळ आकाश निरीक्षकांसाठी आणि खगोलप्रेमींसाठी खास ठरणार आहे. आज आकाशात 'स्ट्रॉबेरी मून'