AI Smart Glasses : मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित स्मार्ट चष्मे, स्मार्ट गॉगल्स आणि इतर वेअरेबल (अंगावर परिधान करता येणाऱ्या) उपकरणांच्या वाढत्या ...
संजय राऊत यांच्याकडून महायुती सरकारवर होणाऱ्या पक्षपाताच्या आरोपांचा खरपूस समाचार घेताना नवनाथ बन यांनी मविआ सरकारच्या काळातील विकासकामांच्या निधीच्या मुद्द्यावरून जोरदार दाखला दिला. मविआ सरकारच्या काळात भाजपच्या १०५ आमदारांना विकासकामांसाठी एक रुपयाचाही निधी देण्यात आला नव्हता, याची आठवण त्यांनी करून दिली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा संपूर्ण विकास ठप्प झाला होता, असा आरोप करत बन म्हणाले की, निधी वाटपात प्रचंड दुजाभाव करणाऱ्या राऊतांनी महायुती सरकारवर बोट ठेवण्यापूर्वी स्वतःच्या तत्कालीन कारभाराचे आणि पक्षपाती धोरणांचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
महिलांचा अपमान करणाऱ्यांनी सन्मानावर बोलू नये; राम मंदिरावरून दाखवला आरसा
नवनाथ बन यांनी महिला सुरक्षा आणि महिला सन्मानासारख्या संवेदनशील विषयांवरून संजय राऊत यांच्यावर ढोंगीपणाचा आरोप केला. एका महिलेविरोधात कथित शिवीगाळ आणि धमक्यांच्या प्रकरणामुळे राऊत आधीच कायदेशीर अडचणीत आले आहेत. त्यामुळे महिलांच्या अधिकारांबाबत किंवा त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही भूमिका मांडण्यापूर्वी राऊतांनी स्वतःचे आचरण तपासावे, असा सल्ला बन यांनी दिला. तसेच, राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राऊतांना सुनावताना ते म्हणाले की, प्रभू श्रीराम आणि रामसेतूच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेससोबत जे राऊत आज बसले आहेत, त्यांना अचानक राम मंदिराचा पुळका आला आहे. मंदिरासंदर्भातील कथित आरोपांची चौकशी सुरू असताना, राम मंदिर आंदोलनाची सातत्याने खिल्ली उडवणाऱ्यांना देशातील रामभक्त कधीही माफ करणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खासदारकीच्या राजीनाम्याची मागणी करण्यापूर्वी स्वतःचा राजीनामा द्या; बन यांचे थेट आव्हान
महायुतीच्या खासदारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या संजय राऊत यांच्या भूमिकेवर नवनाथ बन यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि त्यांना एक थेट आव्हान दिले. राऊत जेव्हा राज्यसभेवर निवडून गेले, तेव्हा त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन शिवसेनेच्या आमदारांच्या मतांचा सर्वात मोठा आधार मिळाला होता. त्यामुळे नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या राऊतांनी आधी स्वतःच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा आणि मगच इतरांच्या नैतिकतेवर बोलावे, असे बन म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला आणि महायुतीच्या विकासकामांना पूर्णपणे स्वीकारले असून, संजय राऊतांनी आता केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुरू असलेले आपले राजकीय नाट्य बंद करावे, असा टोलाही त्यांनी शेवटी लगावला.