Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर नगरी आज अक्षरशः विठूनामाच्या गजराने दुमदुमून गेली. “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम… निवृत्तीनाथ महाराज की जय…” अशा अखंड जयघोषात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत च्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. राज्यभरातून आलेल्या भाविकांमुळे संपूर्ण त्र्यंबकनगरी भक्तीच्या महासागरात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आषाढी एकादशीच्या वारीसाठी निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी हा त्र्यंबकेश्वरमधील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सोहळा मानला जातो. पहाटेपासूनच मंदिर परिसरात वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. हातात भगवे पताके, ओठांवर विठ्ठलनाम आणि टाळ-मृदंगाच्या तालावर नाचणारे वारकरी यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगून गेला होता.

यंदा पालखीची मुख्य पूजा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी आणि हजारो भाविक उपस्थित होते. पालखी प्रस्थानापूर्वी पारंपरिक विधी, आरती आणि पूजन सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला.

यंदा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विकासकामांमुळे त्र्यंबकेश्वर शहरातील पालखीच्या पारंपरिक मार्गात बदल करण्यात आला. निवृत्तीनाथ महाराज मंदिरातून निघालेली पालखी हनुमान मंदिर, चौकी माथा, सुंदराबाई मठ मार्गे कदम मार्गाकडे आणण्यात आली. मार्ग बदलला असला तरी भक्तांचा उत्साह आणि वारकऱ्यांचा जल्लोष मात्र तसाच कायम असल्याचे चित्र दिसून आले.

यानंतर भगवती चौकात पालखीचा रथ थांबविण्यात आला आणि परंपरेनुसार पालखी पायी तीर्थराज कुशावर्त येथे नेण्यात आली. येथे नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, मुख्याधिकारी गोविंद जाधव आणि नगरपरिषद पदाधिकाऱ्यांनी पालखीचे पारंपरिक स्वागत केले. त्यानंतर संतांच्या पादुका आणि मूर्तीला पवित्र स्नान घालून अभिषेक करण्यात आला. या धार्मिक विधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

कुशावर्तातील पूजनानंतर पालखीने पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवासाला सुरुवात केली. "ज्ञानोबा-तुकाराम", "विठ्ठल विठ्ठल" आणि "निवृत्तीनाथ महाराज की जय" अशा अखंड घोषणांनी त्र्यंबकेश्वर परिसर दुमदुमून गेला. भगवे ध्वज, दिंड्यांची शिस्त, पारंपरिक वेशभूषेतील वारकरी आणि भक्तीने भारावलेले वातावरण यामुळे हा सोहळा प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याने त्र्यंबकेश्वर नगरी भक्तीमय झाली. मार्गात बदल असला तरी परंपरा, श्रद्धा आणि वारकऱ्यांचा उत्साह यामध्ये कोणतीही कमी दिसली नाही. हजारो भाविकांच्या जयघोषात आता ही पालखी आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे.