या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे मुंबई ते पुणे हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर. सध्या या दोन शहरांदरम्यान रेल्वेने प्रवास करण्यासाठी सुमारे साडेतीन तास लागतात. मात्र, नवीन हाय-स्पीड मार्गामुळे हे अंतर अवघ्या 48 मिनिटांत पार करता येणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैश्वण यांनी नुकताच या प्रकल्पांचा आढावा घेतला. या नेटवर्कमुळे देशातील प्रमुख आर्थिक आणि औद्योगिक केंद्रांमध्ये वेगवान संपर्क निर्माण होणार आहे.
प्रस्तावित प्रमुख हाय-स्पीड मार्ग
दिल्ली ते वाराणसी – 945 किमी (सुमारे 3.5 तास)
वाराणसी ते सिलगुरी – 670 किमी (सुमारे 2.4 तास)
मुंबई ते पुणे – 170 किमी (48 मिनिटे)
पुणे ते हैदराबाद – 501 किमी (सुमारे 1.6 तास)
या प्रकल्पामुळे दिल्ली ते सिलिगुरी हा प्रवास अवघ्या 6 तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच अहमदाबाद, मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू आणि चैन्नई यांसारखी प्रमुख शहरे वेगवान रेल्वे नेटवर्कने जोडली जाणार आहेत.
2027 मध्ये धावणार पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित बुलेट ट्रेन विकसित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. मुंबई- अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रकल्पाचे बांधकाम सध्या वेगाने सुरू असून दरमहा सुमारे 15 किलोमीटर ट्रॅकचे काम पूर्ण केले जात आहे.
ऑगस्ट 2027 मध्ये भारतातील पहिली बुलेट ट्रेन सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात सुरत ते बिलीमोरा दरम्यान बुलेट ट्रेन धावणार असून त्यानंतर संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे देशातील रेल्वे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.