Andheri Subway: अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी मिलन सब वेच्या पाच पटीने करावे लागणार काम

तरीही प्रशासनाला शंभर टक्के नाही शाश्वती


तब्बल ५०० ते ६०० कोटी रुपये खर्च करून ५० टक्केच मिळणार दिलासा


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईतील अंधेरी सब वेच्या ठिकाणी साचल्या जाणाऱ्या पाण्याचे चित्रण दाखवून मुंबई तुंबल्याचे चित्र निर्माण केले जात असले तरी याठिकाणी २० मिमी एवढा पाऊस पडला तरी याठिकाणी पाणी साचले जाणारच आहे. परंतु या साचल्या जाणाऱ्या पाण्याचा आणि नालेसफाईच्या कामांचा कोणताही संबंध नाही. मात्र, या ठिकाणी पाणी साचले जावू नये म्हणून मिलन सबवेच्या ठिकाणी करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या तुलनेत पाच पटीने काम करावे लागेल, पण त्यानंतरही पाणी साचण्याचे प्रमाण कमी होईल, परंतु ते बंद होणार नाही. त्यामुळे पूर्णपणे पाणी कशाप्रकारे थांबवता येईल याबाबत तज्ज्ञ समितीचा अभ्यास सुरु असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आली आहे.




मुंबईतील मिलन सब वेच्या ठिकाणी साचल्या जाणाऱ्या पाण्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले असून यासाठी बसवण्यात आलेल्या पंपांचे तीन वर्षांचे कंत्राट मंजुरीचा प्रस्ताव समितीच्या पटलावर आला असता भाजपच्या प्रिती सातम यांनी मिलन सब वेच्या ठिकाणी आता पाणी साचत नसून पूर्वी माध्यमांचे प्रतिनिधी या ठिकाणांवर गर्दी करायचे, पण आता ती जागा बदलून अंधेरी सब वे झाला आहे. पहिल्या पावसात अंधेरी सब पाण्याखाली गेल्यानंतर महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी चांगल्या शब्दांत समाचार घेतला. तरीही याठिकाणी पाणी साचले जावू नये म्हणून महापालिका प्रशासन काय उपाययोजना करत आहे. सतचे मोगरा नाला पंपिंग स्टेशनच्या कामाची प्रगती काय आहे आणि होल्डींग स्पॉटसाठी कोणत्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत याची माहिती देण्यात यावी असे मागणी केली. यावर उबाठाचे यशोधर फणसे यांनी मोगरा नाला पूर्णपणे साफ झाला नसल्याचे सांगत कोस्टल रोडच्या कामांमध्ये तिवरांची झाडे कापून विकास करण्यास परवानगी दिली जात आहे, तर मोगरा नाल्यावरील पंपिंग स्टेशनच्या कामांसाठी अशी परवानगी का मिळत नाही असा सवाल केला.


तर मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी मिनी पंपिंग स्टेशनकरता जे कंत्राटदार नियुक्त केले जात आहेत, त्यासर्वांनी संगनमत करून कामे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. तिनच कंत्राटदारांनी आपापसात कामे विभागून घेतली आहेत. त्यामुळे हे पंप भाडयाने घेण्याऐवजी मालकी तत्वावर घेण्यात यावे अशी सूचना केली. पंपांच्या बाबती कायमस्वरुपी निर्णय घेतला जावा अशी सूचना अश्रफ आझमी यांनी करून पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंप लावणारे हे एकमेव शहर असेल,असे म्हटले आहे.



यावर प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी पावसाळ्यात अंधेरी सब वे २० ते ३० वेळा पाण्याखाली जातो. ताशी ५० मि.मी पाऊस पडल्यास १ लाख ५७ हजार क्युसेस पाणी वाहून जातो. मिलन सब वेच्या ठिकाणी होल्डींग स्पॉट अर्थात साचणारे पाणी टाक्यांमध्ये वळवण्यासाठी जे बांधकाम केले आहे, त्याची क्षमता ३० हजारची आहे. म्हणजे अंधेरी सब वेच्या ठिकाणी वाहून जाणारे पाणी पाहता मिलन सबवेच्या ठिकाणी बसवेल्या व्यवस्थेच्या पाच पटीने उभारणी करावी लागणार आहे. यासाठी ५०० ते ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पण एवढा खर्च करूनही पाणी साचण्याचे प्रमाण पूर्णपणे कमी होणार नसून ते केवळ निम्म्यावर येणार आहे. भरतीच्या वेळी १९ ते २० मि.मी पाऊस पडला तरी पाणी साचणार आहे, आणि आहोटीच्या वेळी ४० मि.मी पेक्षा जास्त पाऊस पडल्यास पाणी साचले जाणार आहे. याठिकाणी चार नाल्यांचे पाणी प्रचंड गतीने येत असून ते केवळ १३ मीटर रुंदीच्या जागेत येत असते. तसेच या सब वेच्या खाली भूमिगत टाकी बांधून होल्डींग स्पाॅट बनवण्याचा विचार केल्यास दीड वर्ष वाहतूक बंद करावी लागणार आहे. ते करून चालणार नाही. तसेच अन्य दोन जागांचा शोध सुरु आहे. यासाठी पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये याचा प्रारुप समोर येईल.मोगरा नाला पंपिंग स्टेशनकरता एक परवानगी शिल्लक आहे, ती सुध्दा येत्या दिवसांमध्ये येईल आणि या कामाला सुरुवात होईल,असे बांगर यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

BMC News : मुंबई रेबीज निर्मूलनासाठी महानगरपालिका आणि मिशन रेबीज इंडिया यांच्यात सामंजस्य करार

मुंबई : मुंबईतील (Mumbai) भटके श्वान (Dogs) व मांजरींचे (Cats) लसीकरणासाठी तसेच ‘रेबीजमुक्त मुंबई’ करण्यासाठी मुंबई

Chandrashekhar Bawankule : शेती, शेतरस्त्याच्या भांडणात आता ई-मेलवर मिळालेली नोटीस ग्राह्य

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय; बाधित शेतकऱ्यांना मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण मुंबई : ग्रामीण

Devendra Fadnavis : नीती आयोगाच्या निर्देशांकांवर पुढील ४ वर्षांत परिणामकारक कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

Pavana Dam : पवना धरण ९३ टक्क्यांहून अधिक भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मावळ : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Ashadhi Wari Charan Seva : ‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; १४ जिल्ह्यांतील ४.९६ लाख वारकऱ्यांना थेट लाभ

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा २४ जुलै रोजी समारोप; १४०

Maharashtra Cyber ​​Cell : महाराष्ट्र सायबर सेल कात टाकणार

- केंद्र सरकारच्या धर्तीवर 'हायटेक' रचना; सर्व यंत्रणा येणार एका छताखाली मुंबई : वाढत्या सायबर गुन्ह्यांवर वेगाने