खान्देशची ओळख असलेल्या अहिराणी बोलीला आता जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली असून, गुगलने अहिराणी भाषेला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अहिराणी भाषा गुगल कीबोर्डवर सहज टाईप करता येणार असून, डिजिटल माध्यमातही या मायबोलीचे स्थान निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे खान्देशवासीयांमध्ये आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अहिराणी ही फक्त बोली नसून खान्देशच्या संस्कृतीचा, लोकजीवनाचा आणि परंपरेचा आत्मा मानली जाते. गावखेड्यांतील दैनंदिन व्यवहार, लोकगीते, सण-उत्सव, नातेसंबंध आणि लोकसंस्कृती यामध्ये अहिराणीचा गोडवा आजही टिकून आहे. आता गुगलसारख्या जागतिक तंत्रज्ञान मंचावर या बोलीला स्थान मिळाल्याने तिच्या जतन आणि संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.
राज्यात एकीकडे नव्या शैक्षणिक वर्षाची लगबग सुरू असताना, दुसरीकडे गगनाला भिडलेल्या पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Diesel Price) दरांमुळे स्कूल बस व्यावसायिक ...
या यशामागे जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ, विविध सामाजिक-सांस्कृतिक संस्था, साहित्यिक, कवी, संशोधक आणि भाषा प्रेमी यांचे दीर्घकालीन प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. अनेक वर्षांपासून विविध माध्यमांतून अहिराणी भाषा जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने कार्य करण्यात येत होते.
गुगलवरील मान्यतेमुळे नव्या पिढीला अहिराणी भाषेशी जोडण्यास मदत होणार असून, डिजिटल युगात मायबोली अधिक सक्षमपणे पुढे येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.“जी भाषा टिकते, ती संस्कृती टिकते,” या भावनेतून आता अहिराणी अधिक अभिमानाने बोलली, लिहिली आणि जपली जावी, अशी भावना खान्देशवासीयांकडून व्यक्त होत आहे.