भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला
कॉक्रोच जनता पार्टीला सरकार घाबरल्याचा दावा करणाऱ्या संजय राऊत यांनी लक्षात घ्यावे की, तुमच्यासारख्या महाविकास आघाडीच्या गिधाडांना हे सरकार घाबरले नाही. कोविडच्या काळात मुंबईकरांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना सरकार घाबरले नाही. स्वयंपाक घरामधील झुरळांचा कसा बंदोबस्त करायचा, हे प्रत्येक माता-भगिनीला माहीत असते. आमच्याकडे देशभक्तीचे ‘हिट’ आहे आणि त्या माध्यमातून या झुरळाचा निश्चितपणे बंदोबस्त केला जाईल. जाणीवपूर्वक काही लोक देशातल्या तरुणाईला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीची षडयंत्रे योजतात. तुमच्यासारख्या गिधाडांना घरी बसवणारी देशातील जनता या झुरळांचाही योग्यवेळी समाचार घेण्याचे काम निश्चितपणे करेल, असा जोरदार टोला भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी लगावला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.तरुणाईची माथी भडकवण्याचे काम करत ज्या पद्धतीने बांगलादेशात हिंसाचार झाला, नेपाळमध्ये हिंसाचार झाला. अगदी तशाच पद्धतीचा हिंसाचार भारतात घडवून आणण्याचे प्रयत्न परदेशात बसलेल्या काही लोकांनी करायचे ठरवले आहे. परंतु इथली तरुणाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे. इथली तरुणाई देशभक्तीच्या पाठीशी असल्याने अशा पद्धतीचे माथी भडकवण्याचे प्रयत्न कितीही केले तरीही त्यात कोणीही यशस्वी होणार नाही. संजय राऊत यांच्यासारखे गिधाडी वृत्तीचे लोक तर यात अजिबातच यशस्वी होणार नाहीत, असे श्री. बन यांनी ठणकावून सांगितले.
संजय राऊत, महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवले आहे की उबाठा गटाचे अस्तित्व पार संपवून टाकायचे, ही शिल्लक सेना, किंचित सेना अजून वंचित करून तिला घरी बसवायचे. महाराष्ट्रातल्या जनतेसोबत प्रतारणा केल्याने, द्रोह केल्याने, देशातल्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसल्याने जनतेने तुमचा पक्ष संपवून टाकायचा हे मनाशी पक्के केलेले आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळात तुमच्या पक्षाची अशीच वाताहात होणार आहे. तुमचा पक्ष आता काँग्रेसमध्ये विलीन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्हाला त्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही, असे श्री. बन यांनी सुनावले.
इंधनाची जाणीवपूर्वक टंचाई निर्माण करण्याचे प्रयत्न
काही लोक इंधनाचा काळाबाजार आणि साठेबाजी करून जाणीवपूर्वक टंचाईसदृश परिस्थिती निर्माण करत आहेत. यात प्रामुख्याने काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोकही सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सगळ्यांची चौकशी करून या साठेबाजांवर कारवाई करण्यात येणार आहे, हे संजय राऊत यांनी लक्षात घ्यावे. इराण आणि इस्रायलच्या युद्धानंतर जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा भडका उडाला आहे. चीनमध्येही पेट्रोल आणि डिझेलचे दर 25 टक्क्यांनी वाढलेत. केवळ भारत असा एकमेव देश आहे जिथे केवळ चार टक्केच दर वाढले आहेत. भारतात कुठेही इंधन टंचाई नाही. काही लोक जास्तीचे इंधन साठवत असल्याने आणि काही ग्रामीण भागात खास करून मराठवाडा, जालना, संभाजीनगर या ठिकाणी काही लोक जाणीवपूर्वक साठेबाजी करत पेट्रोल - डिझेलची टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत. परंतु हे सरकार सजग आहे. अशा साठेबाजांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे श्री. बन यांनी बजावले.