रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस दडपशाहीचा निषेध करत भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुकारलेल्या राज्यव्यापी 'झारखंड बंद'मुळे जनजीवन विस्कळीत झाले. दुसरीकडे, झारखंडच्या विविध भागांत भाजपने रस्ते अडवून चक्का जाम केला असून, जुन्या विधानसभेजवळ निदर्शने करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या २०० हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Jharkhand)
झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगच्या परीक्षांमधील कथित अनियमितता, जेएसएससी- सीजीएल परीक्षा तातडीने रद्द करणे आणि संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण ब्युरोमार्फत निष्पक्ष चौकशी करणे, या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थी आणि परीक्षाार्थी गेल्या काही दिवसांपासून तीव्र आंदोलन करत आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून सोमवारी विद्यार्थ्यांनी 'विधानसभा घेराव' मोर्चा काढला होता. मात्र, नवीन विधानसभेकडे मार्च काढत असलेल्या या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज आणि वॉटर कॅननचा (पाण्याचा मारा) वापर केला. या हिंसक कारवाईमध्ये शेकडो विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा विद्यार्थी संघटनांनी केला आहे. (Jharkhand)
अंबरनाथ : अंबरनाथच्या रॉयल फ्लोरा फेज-२ मध्ये २६ जुलैला बाराव्या मजल्यावरून एक मांजर खाली ढकलून दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे ...
विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि पोलिसांच्या अतिरेकाचा तीव्र निषेध करत झारखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदित्य साहू यांनी हेमंत सोरेन सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आमच्या मुलांवर आणि विद्यार्थ्यांवर अन्याय आणि अत्याचार झाले आहेत. नोकऱ्यांची विक्री, पेपरफुटी आणि आमच्या मुलांच्या शरीरावर ज्या प्रकारे लाठ्या चालवण्यात आल्या, त्याविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनात आज भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरून झारखंड बंद ठेवत आहेत," असे आदित्य साहू यांनी सांगितले. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, "हेमंत सोरेन यांनी कधीही गरिबी किंवा संघर्ष अनुभवलेला नाही, त्यामुळेच ते विद्यार्थ्यांशी अशी असंवेदनशील वागणूक करत आहेत."
झारखंडचे विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनीही सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, "गेल्या १५ दिवसांपासून विद्यार्थी धरणे आणि उपोषण करत आहेत. विद्यार्थ्यांची केवळ सीबीआय चौकशीची साधी मागणी असताना, सरकारने त्यांच्यावर बळाचा वापर केला. सरकारने आधीच या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले असते, तर आज ही वेळ आली नसती." (Jharkhand)
भाजपच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदमुळे झारखंडच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्ते ब्लॉक करून रास्ता रोको केला, ज्यामुळे प्रवाशांना आणि सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दुसऱ्या बाजूला, विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जविरोधात जुन्या विधानसभेजवळ एबीव्हीपीच्या विद्यार्थी संघटनेने आक्रमक निदर्शने केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी कठोर पावले उचलली आणि जुन्या विधानसभेजवळ प्रदर्शन करणाऱ्या २०० हून अधिक एबीव्हीपी कार्यकर्त्यांना तातडीने ताब्यात घेतले.